

Resolve all pending demands of journalists
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : दररोज बातमीसाठी धावपळ करत असताना ऊन, वारा, पावसाची तमा न बाळ-गणाऱ्या पत्रकारांचे योगदानही मोठे आहे. त्यांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप आवश्यक असते असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या सर्व प्रलंबित मागण्या तत्काळ सोडवू, असे आश्वासन दिले.
जिल्हा मराठी पत्रकार संघाचा कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. १२) धाराशिव नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा. रवींद्र गायकवाड, माजी आ. ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ. किर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. शिंदे म्हणाले, की पत्रकार हे दररोज बातमीसाठी धावत असतात. ते कशाचीही तमा बाळगत नाहीत.
सरकारच्या कामांना प्रसिध्दी देतात. त्यामुळे त्यांच्या प्रलंबित असलेल्या समस्या, मागण्या पूर्ण करणे आमचे कर्तव्य आहे. ते आम्ही पूर्ण करु. शोधवार्ता गटातून प्रथम बालाजी पांडुरंग वडजे (उमरगा), अमोल भास्कर मुळे द्वितीय (बीड), राजहंस तुकाराम कांबळे (उदगीर, जि. लातूर) व रोशन मुल्ला तृतीय (बीड)
तर विशेष वार्ता गटातून माधव आटकोरे (नांदेड) प्रथम, रमेश अर्जुन कदम (हिंगोली) द्वितीय, दिपक लिंबराज बारकुल (येरमाळा, जि. धाराशिव) व डॉ. रविंद्र भताने (चापोली, जि.लातूर) तृतीय यांना कै. अनंत भालेराव स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सरचिटणीस संतोष जाधव, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, उपाध्यक्ष अब्बास सय्यद व श्रीकांत कदम उपस्थित होते.