

धाराशिव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) नोंदणी प्रक्रियेत होत असलेल्या गैरसोयीबाबत दै. पुढारीने वृत्त प्रकाशित करून प्रश्न ऐरणीवर आणला होता.
यानंतर रुपामाता फाऊंडेशनचे सचिव अॅड. अजित गुंड यांनी परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. दै. पुढारीच्या या पाठपुराव्याला यश आले असून जिल्ह्यातील नोंदणी केंद्रांवरील व्यवस्था आता अधिक सुरळीत झाली आहे.
एनसीएमसी कार्डासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि इतर सवलतधारक प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने तासनतासस रांगेत थांबावे लागत होते. ग्रामीण भागातील नागरिकांनाही याचा मोठा फटका बसत होता. पहाटे पाच वाजता ज्येष्ठ नागरीक, सवलत धारक प्रवासी हे कार्ड नोंदणीसाठी बसस्थानकातील नोंदणी केंद्रासमोर रांगा लावत होते.
त्यानंतर केंद्रचालक दहा वाजता उघडून ११ वाजता नोंदणी बंद होत होती. यावर पुढारी प्रकाश टाकला होता. दै. पुढारीत हे वृत्त प्रसिध्द होताच ॲड.अजित गुंड यांनी एसटी महामंडळाला हे निवेदन दिले होते. त्यानंतर पालकमंत्री कार्यालयाने या प्रकरणाची तत्काळ दखल घेत संबंधित यंत्रणा व एजन्सीला आवश्यक सूचना दिल्यानंतर नोंदणी प्रक्रियेत सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे केंद्रांवरील कामकाजाला गती मिळाली असून नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.