परंडा : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर एससी, एसटी, ओबीसी बचाव यात्रा 'वंचित'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात येत आहे. ही यात्रा रविवारी (दि.२८) मराठवाड्याचे प्रवेशद्वार धाराशिव येथे आली. यावेळी ओबीसी आरक्षणाबद्दल राजकीय पक्षांनी आपली भूमिका व्यक्त करावी, असे म्हणत आंबेडकर यांनी सत्ताधारी इतर राजकीय पक्षांचा मराठा व ओबीसी आरक्षणावरुन चांगलाच समाचार घेतला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ही यात्रा ओबीसीचे शंभर आमदार निवडून आणण्यासाठीच आहे. जर तुम्ही तुमच्या पक्षातून ओबीसीचे शंभर उमेदवार विधानसभेत निवडून आणलात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच लोकसभेपासून इतर पक्षाची मानसिकता लक्षात येत आहे. हे सगळे पक्ष एसीसी, एसटी, ओबीसी यांना आरक्षण असल्यामुळे राजकीय आरक्षणपोटी निवडणुकीला उभे करतात. जर आरक्षण नसते, या संबंधितांना डावलण्याची मानसिकता या सर्व राजकीय पक्षांची असल्याचे सांगितले.
जरांगे पाटील यांची भुमिका मराठयांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, अशी आहे.तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, आमच्या ताटातील देऊ नका, अशी ओबीसीची भूमिका आहे. पण याबाबत राजकीय पक्षाची काय भुमिका आहे, ती स्पष्ट झालेली नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, देवेंद्र फडवणीस यांनी आपली भुमिका स्पष्ट करावी, असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले.
राजकीय पक्ष तुम्हाला झुलवत आहेत. ओबीसीला स्वतःचे आरक्षण वाचण्यासाठी लढा उभारावा लागणार असून जरांगे व देवेंद्र फडणवीस यांचे भांडण हे खोटे आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच शरद पवार यांची सत्ता आली तर ओबीसीची जनगणना करण्याचा निर्णय घेतला जाईल व जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत ओबीसीच्या शिक्षण आणि नोकरी आरक्षणास स्थगिती दिली जाईल. त्याला आम्ही काहीच करुच शकत नाही, असे सबंधित सत्ताधारी सांगतील. त्यामुळे आता ओबीसीचे आरक्षण वाचण्यासाठी आपल्याला शंभर आमदार निवडून आणावे लागतील. त्यासाठी सर्व ओबीसीनी जातपात विसरून एकत्र आले पाहिजे, असेही आवाहन आबेडकर यावेळी केले.