

संतोष शिंदे
परंडा : “वासुदेव आला हो नारायण नारायण!”एकेकाळी गावोगाव घुमणारा हा आवाज केवळ भजनाचा नव्हता... तर संस्कृती, नीती आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणारा होता. मात्र आज तोच आवाज आधुनिक व्यवस्थेच्या गोंगाटात हरवताना दिसत आहे.
वासुदेव परंपरा ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जिवंत इतिहास आहे. भक्ती, सेवा आणि समाजजागृती यांचा सुरेख संगम असलेली ही परंपरा पूर्वी ग्रामीण समाजाची प्रभावी संवाद यंत्रणा होती. सण-उत्सव, संस्कार, नीतीमूल्ये आणि सामाजिक ऐक्य जपण्याचे काम वासुदेवांनी पिढ्यान् पिढ्या केले. मात्र आज याच परंपरेला उपेक्षेच्या वेशीवर उभे राहावे लागत आहे. काळानुसार तंत्रज्ञान आले, जीवनशैली बदलली; पण या बदलाच्या प्रवासात परंपरेचा सन्मान मात्र हरवला.
आज वासुदेवांकडे लोक संस्कृतीचे वाहक म्हणून न पाहता भिक्षेकरी म्हणून पाहू लागले आहेत. ही केवळ सामाजिक मानसिकतेची शोकांतिका नसून सांस्कृतिक धोरणांच्या अपयशाचे द्योतक आहे. राज्यभर लोककला व लोकपरंपरा जपण्याच्या घोषणा केल्या जातात. महोत्सव, परिषद आणि भाषणांतून मोठे दावे होतात. मात्र प्रत्यक्षात वासुदेव परंपरेसाठी ठोस धोरणे कुठे आहेत, असा सवाल उपस्थित होतो.
नोंदणी, आर्थिक सहाय्य, आरोग्य सुरक्षा, प्रशिक्षण यासारख्या मूलभूत बाबी आजही केवळ कागदावरच दिसतात. ज्या परंपरेने समाजाला शतकानुशतके दिशा दिली, ती आज शासनाच्या उदासिनतेचा सामना करत आहे.
नवी पिढी अन् तुटलेली परंपरा
आर्थिक अस्थिरता, सामाजिक अवहेलना आणि भविष्यातील अनिश्चिततेमुळे वासुदेव कुटुंबातील नवी पिढी या परंपरेपासून दूर जात आहे. ही बाब केवळ एका समाजापुरती मर्यादित न राहता संपूर्ण सांस्कृतिक वारशाच्या तुटण्याची नांदी ठरत आहे. वासुदेव परंपरा टिकवायची असेल, तर केवळ भावनिक नव्हे, तर ठोस निर्णय, योजना आणि सामाजिक संवेदनशीलता आवश्यक आहे. अन्यथा ‘नारायण नारायण’चा हा संस्कृतीचा आवाज इतिहासाच्या पानांतच सीमित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
आमच्या कुटुंबात वासुदेव म्हणून मी एकटाच फेरीला जातो. पूर्वीसारखी लोकांची आपुलकी राहिलेली नाही. आदर कमी झाला आहे. त्यामुळे आमची मुले हे काम करण्यास धजावत नाहीत. ती शेती व मजुरीकडे वळली आहेत.
गोरख दिगंबर धुरवे, शिराळा, जि. धाराशिव