

One teacher for 300 students of 9th and 10th standard
ईट, पुढारी वृत्तसेवा : एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद होण्याच्या मार्गावर असताना, दुसरीकडे ईट (ता. भूम) येथील शंभर वषपिक्षा अधिक इतिहास असलेली जिल्हा परिषद शाळा शिक्षकांअभावी अडचणीत आली आहे. विद्यार्थ्यांची संख्या भरपूर असतानाही केवळ एकच शिक्षक संपूर्ण माध्यमिक वर्गाचे शिक्षणाचे ओझे पेलत आहे. नववी, दहावीच्या ३०० विद्यार्थ्यांना केवळ एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे पालकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत.
ईट येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता १ ली ते १० वीपर्यंत सुमारे १,२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील नववी व दहावीमध्येच २८५ ते २९० विद्यार्थी असूनही, या दोन वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. या वर्गासाठी पाच शिक्षकांची मान्यता असताना, चार पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून गणित, विज्ञान, समाजशास्त्र यांसारख्या महत्त्वाच्या विषयांना शिक्षकच नाहीत.
त्याचप्रमाणे मुख्याध्यापकाचे पद १९९६ पासून रिक्त असून प्रभारी व्यवस्था सुरू आहे. नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षकांचा आधार घेत पर्यायी असली तरी ती विद्यार्थ्यांच्या शैक्षिणक भवितव्याशी खेळण्याचा प्रकार असल्याची टीका होऊ लागली आहे. गंभीर बाब म्हणजे, अशा प्रतिकूल स्थितीतही शाळेचा दहावीचा निकाल सलग १०० टक्के लागत आहे, तोही सेमी इंग्रजी माध्यमातून. विद्यार्थ्यांनी नवोदय, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा यामध्ये घवघवीत यश मिळवले आहे. राज्यस्तरीय, विभागीय व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये देखील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. शाळेने आपल्या गुणवत् ोच्या जोरावर मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा उपक्रमांतर्गत जिल्हास्तरावर बक्षीसही पटकावले आहे. तरीसुद्धा शिक्षण विभागाने या शाळेकडे साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. संचमान्यतेसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू असतानाही ती देण्यात टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप पालक करत आहेत.
ही संचमान्यता दिल्यास शिक्षक भरती शक्य होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान थांबू शकते, असे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भूम तालुक्यात अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या नगण्य असून शिक्षक भरपूर आहेत. त्याउलट ईट शाळेत विद्यार्थ्यांची भरघोस उपस्थिती असूनही शिक्षक नसल्याचे विषम चित्र आहे. या दुटप्पी धोरणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शासन व शिक्षण विभागाने याचा तातडीने विचार करून ठोस पावले उचलावीत, ही पालकांची जोरदार मागणी आहे.माध्यमिक शिक्षण हे उच्च शिक्षणाचा पाया आहे. प्रत्येक विषयासाठी शिक्षक असणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण भागातील ही शाळा म्हणजे शिक्षणाचा आधार आहे. जर शिक्षकांची भरती लवकर न झाल्यास पालकवर्ग तीव्र आंदोलन करेल.