धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने मंत्री छगन भुजबळ यांचे ऐकून मराठ्यांच्या शंभर वर्षांपूर्वीच्या आढळलेल्या नोंदी रद्द केल्या. तर राज्यातील सर्व रस्ते जॅम करुन २८८ जागांवरील भाजपचे उमेदवारही पराभूत करु, असा थेट इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी दिला.
मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचे बुधवारी (दि. १०) आयोजन केले होते. या रॅलीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून लाखो मराठा बांधव सहभागी झाले होते. या रॅलीमुळे शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. सकाळी १० वाजता निघणारी रॅली प्रत्यक्षात दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान सुरु झाली. अहिल्यादेवी होळकर चौकातून निघालेली रॅली धारासूर मर्दिनी मंदीर, ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्गा, विजयचौक, बाजारचौक, काळा मारुती चौक, पोस्ट ऑफीस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळामार्गे शिवाजी चौकात पाचच्या सुमारास आली. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर जरांगे यांनी उपस्थित मराठा बांधवांना संबोधित केले.
ते म्हणाले, की आजपर्यंतच्या इतिहासात प्रत्येक वेळी मराठा समाजावर अन्यायच झालेला आहे. आता मात्र तसे होणार नाही. लढाईत मराठा समाज उतरतो ते विजय मिळविण्यासाठीच. त्यामुळे ओबीसीतून आरक्षण मिळविल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. जिवात जीव आहे तोपर्यंत आरक्षण मिळविणार. समाजाने आपली एकजूट कायम ठेवावी. आशिर्वाद कायम ठेवावा. सरकारने मला उघडे पाडण्यासाठी अनेक डाव टाकण्यास सुरुवात केली असली तरी मीही हे सर्व डाव उलटविण्यास समर्थ आहे. केवळ समाजाने साथ, एकजूट कायम ठेवावी.
हा लढा गरीब तसेच श्रीमंत मराठ्यांच्या पोरांसाठी आहे. फडणवीस तसेच सरकारने भुजबळांना सांगून काही पडेल लोकांना एकत्र करुन ओबीसींना भडकविण्याचे काम केले आहे. तरीही गरीब मराठा व गरीब ओबीसींना सांगणे आहे, की त्यांनी भुजबळांच्या षड्यंत्राला बळी पडू नये. गोरगरिबांची घरे जळाल्यानंतर कोणीही मदतीला येत नाही. ओबीसी, धनगर समाजासोबत आमचे वैर नाही. आमच्या मागणीमुळे कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. केवळ व्यवसायावर आधारीत जे ओबीसीतून आरक्षण दिले गेले आहे, तेच आम्ही मागत आहोत. यावर छगन भुजबळ हे मात्र जातीयवादी भूमिका घेऊन ओबीसी व मराठा समाजात तेढ निर्माण करीत असल्याची टीका जरांगे यांनी केली.
जरांगे म्हणाले, की भुजबळांना बळ देण्याचे काम फडणवीसांनी करु नये. त्याच्या नादाला लागल्यामुळे जेलमध्ये जाण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते. तसेच तुमच्या कारकिर्दीत भाजपची महाराष्ट्रात वाट लावून घेण्याची वेळ येऊ देऊ नका. गिरीश महाजनांच्या मतदारसंघातील मराठेही भेटत आहेत. तिथे एक लाख 36 हजार मराठा बांधव आहेत. त्यामुळे महाजनांनी विधानसभेची काळजी करावी.