

भूम : तालुक्यातील माणकेश्वर येथील ग्रामदैवत श्री सटवाई देवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढण्याच्या निर्णयावरून गुरुवारी गावात तणावपूर्ण व भावनिक वातावरण निर्माण झाले. पुरातत्त्व विभाग, छत्रपती संभाजीनगर येथील तज्ञांची टीम शेंदूर काढण्यासाठी दाखल झाली होती; मात्र देवस्थान ट्रस्ट व काही ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे तज्ञांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला.
मूर्तीशास्त्रानुसार देवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढून मूळ स्वरूप जतन करावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश अंधारे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांच्या मागणीची दखल घेत तहसील कार्यालय भूम तसेच पुरातत्त्व विभागाच्या पत्रव्यवहारानुसार शेंदूर रासायनिक पद्धतीने काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच अनुषंगाने पुरातत्त्व विभागाची तज्ञांची टीम सकाळी मंदिर परिसरात पोहोचली.
मात्र सटवाई देवस्थान ट्रस्ट व काही ग्रामस्थांनी परंपरा आणि श्रद्धेचा मुद्दा उपस्थित करत शेंदूर काढण्यास विरोध दर्शविला. देवीसमोरील सभामंडपात ग्रामस्थ, ट्रस्ट पदाधिकारी व उपोषणकर्त्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते; मात्र पोलीस बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली.
पुरातत्त्व अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंना समजावण्याचा प्रयत्न केला; तरीही तोडगा न निघाल्याने तज्ञांच्या टीमला कोणतीही प्रक्रिया न करता माघारी परतावे लागले. दरम्यान, पुरातत्त्व विभागाने दोन्ही बाजूंनी कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
त्या निर्णयानुसार देवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढायचा की कायम ठेवायचा यावर पुढील कार्यवाही होणार आहे. या बैठकीला तक्रारदार, ट्रस्टचे माजी व विद्यमान पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धा विरुद्ध संवर्धन या मुद्यावरून माणकेश्वरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
संवर्धन आवश्यकच
माणकेश्वर येथील सटवाई देवीची पाहणी करण्यासाठी आलो होतो. तक्रारदार, ग्रामस्थ व ट्रस्ट यांचे म्हणणे ऐकून घेतले. मूर्तीचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. मूर्तीची संपूर्ण पाहणी केल्यानंतर अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाकडे सादर करण्यात येईल असे पुरातत्त्व विभागाचे सागर मुंडे यांनी सांगितले.
मूर्तीचे आयुष्य वाढेल
श्री सटवाई देवी ही गावची ग्रामदैवत आहे. मूर्तीवरील शेंदूर काढल्यास तिचे आयुष्यमान हजारो वर्षे वाढू शकते, या प्रामाणिक भावनेतून आम्ही ही मागणी करत आहोत. मात्र काही जण जाणीवपूर्वक विरोध करत आहेत. शेंदुरामुळे मूर्ती खराब अवस्थेत गेली आहे असे सामाजिक कार्यकर्ते गणेश अंधारे यांनी सांगितले