

रत्नापूर : कळंब तालुक्यातील उपळाई व शेलगाव दिवाणी परिसरातील वन विभागाच्या तब्बल 109 हेक्टर क्षेत्रात सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे जंगलातील जलस्रोत आटत असताना, वन विभागाच्या निष्काळजी कारभारामुळे वन्यजीवांवर गंभीर संकट ओढवले आहे.
उपळाई येथे सुमारे 60 हेक्टर तर शेलगाव दिवाणी येथे 49 हेक्टर असे मिळून 109 हेक्टर क्षेत्रात पाणवठे पूर्णपणे नादुरुस्त अवस्थेत आहेत. शासनाकडून या पाणवठ्यांसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात असतानाही त्यांची दुरुस्ती न झाल्याने वन्य प्राणी पाण्याअभावी त्रस्त झाले आहेत.
या परिसरात मोर, माकड, ससे, हरिण यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. मात्र पाण्याची सोय नसल्याने हे प्राणी गावाकडे व रस्त्यांकडे वळत असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे जवळून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-सोलापूर महामार्गावर अनेक वेळा वन्य प्राण्यांचे अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
उपळाई येथील गट क्रमांक 644 मध्ये सुमारे 50 आर क्षेत्रात पावसाळ्यासाठी 50 हजार रोपे तयार करण्यात आली होती. मात्र पाण्याअभावी ही सर्व रोपे जळून खाक झाली. शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षलागवडीचे नियोजन करत असले तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे. मलकापूर येथील वन्यजीवप्रेमी सुंदर लोमटे यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून पाणवठे नादुरुस्त असून त्याकडे वन विभाग पूर्णतः दुर्लक्ष करत आहे.
जुने अनुभवी वनमजूर काढून टाकण्यात आले असून नवीन कर्मचाऱ्यांना कामाचा अनुभव नसल्याने ते या भागात फिरकतही नाहीत, असा आरोप त्यांनी केला.दरम्यान, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन ‘कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर’ असल्याचे सांगण्यात आले. एकूणच, लाखो रुपयांचा खर्च करूनही वन्यजीवांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांकडे होत असलेले दुर्लक्ष गंभीर बाब असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.