

Heavy rains cause crop damage, farmers worried
लोहारा, पुढारी वृत्तसेवा: परिसरासह संपूर्ण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हंगामी पिके अवकाळी पावसाच्या तडाख्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. त्यामुळे संपूर्ण नुकसानीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत तात्काळ देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सोयाबीन, उडीद, तूर, ऊस या खरीप पिकांनी शेतकऱ्यांना यंदा भरघोस उत्पादनाची आशा दाखवली होती. बियाणे, खते, कीटकनाशके व मजुरीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज काढले होते. मात्र, सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे.
अनेक ठिकाणी उभी पिके आडवी पडून कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली असून रो गराई पसरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीचे आणि गुंतवणुकीचे पाणी पाणी झाले आहे.
गावागावांत शेतकरी पिकांचे वाळ लेले, कुजलेले व पडलेले दृष्य पाहून व्यथित झाले आहेत. "संपूर्ण वर्षाची मेहनत वाया गेली, आता कुटुंब चालवायचे कसे?" असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांना बँकेची कर्जे फेडणे अशक्य झाले असून सावकार व व्याजाचा ताण प्रचंड वाढला आहे.
ग्रामीण भागात शेतकरी वर्गातून एकमुखाने मागणी होत आहे की सरकारने पंचनाम्याची दिरंगाई न करता सरसकट आर्थिक मदत हेक्टरी ५० हजार प्रमाणे द्यावी. यासोबतच शेतकऱ्यांच्या पीककर्जाची माफी करावी, पुढील हंगामासाठी मोफत किंवा अनुदानित दराने बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी जोर धरत आहे. सततचे नैसर्गिक संकट, वाढते कर्ज, बाजारभावाचा ताण आणि शासनाच्या असमर्थ योजनांमुळे शेतकरी आत्महत्या करण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
आता जर तातडीची मदत मिळाली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. लोहारा तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु पावसाने संपूर्ण ऊस आडवा पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी कोणतेही पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना भरघोस मदत करणे आवश्यक आहे.