

Guardian Minister Pratap Saranaik hoisted the flag on Marathwada Liberation Day at Dharashiv
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी प्रतिकूल परिस्थितीत दाखविलेली जिद्द, त्याग आणि एकजुटीची प्रेरणा घेऊन आजच्या संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या संकटावरही मात करूया. संकट कितीही मोठे असले तरी सरकार जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यापूर्वी त्यांनी स्मृतिस्तंभास पुष्प अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.
यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. कैलास पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी व नागरिक उपस्थित होते. यंदा पावसाचे प्रमाण कमी असून पावसात दीर्घ खंड पडल्याने संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय विशेष आराखडे तयार करण्यात आले आहेत.
उपलब्ध जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन, पर्यायी जलस्रोतांचा वापर आणि अनधिकृत पाणीउपसा रोखण्यावर भर दिला जात आहे. 'पाणी अडवा, पाणी जिरवा आणि उपलब्ध पाणी जपून वापरा' हा संदेश लोकचळवळ बनविण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकरी हा ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा कणा असून कर्जमुक्ती, पीकविमा, बाजारपेठ व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील गुंतवणुकीतून रोजगारनिर्मिती, पर्यटन विकास आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी तीन अनाथ बालकांना 'आपले सरकार सेवा केंद्र' मंजुरीची प्रमाणपत्रे तसेच सात गटई कामगारांना प्रत्येकी एक पत्र्याचा स्टॉल व पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले. मराठवाड्याची खरी ताकद मातीमध्ये नव्हे, तर माणसांच्या जिद्दीमध्ये आहे. प्रयत्न केल्यास पाणीटंचाईसह कोणत्याही संकटावर मात करता येईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.