

Five corporators likely to join the Shinde-led Shiv Sena
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा नगर परिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाच नगरसेवकांचा गट लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या प्रवेशाचा कार्यक्रम पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडीमुळे ठाकरे गटाला नगर परिषदेत मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे.
नगर परिषद निवडणुकीत ठाकरे गटाच्या तिकिटावर निवडून आलेल्या या नगरसेवकांनी अवघ्या आठ महिन्यांत पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. हे नगरसेवक सुरुवातीला भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती.
त्यासाठी भाजपकडूनही जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र, या हालचालींची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित नगरसेवकांशी संपर्क साधून त्यांची मनधरणी केल्याची चर्चा आहे. त्यानंतर भाजपऐवजी शिंदे गटात जाण्याचा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे.
या प्रवेशानंतर ठाकरे गटाकडे नगर परिषदेत केवळ दोन नगरसेवक उरणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, नगरसेवकांची पळवापळवी म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याची टीका ठाकरे गटाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी केली. ठाकरे परिवाराशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघर्ष सुरू ठेवू, असे त्यांनी सांगितले-
मतदारांचा विश्वासघात ?
नगरसेवकांनी निवडणुकीत ज्या पक्षाच्या चिन्हावर मतदारांकडून मते घेतली, त्याच पक्षाला अवघ्या आठ महिन्यांत सोडून सत्ताधारी गटात जाणे योग्य आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. विकासकामांसाठी सत्तेसोबत जाण्याचा दावा केला जात असला, तरी मतदारांनी दिलेल्या कौलाचा हा अनादर तर नाही ना, अशी चर्चाही शहरात सुरू आहे. या पक्षप्रवेशासाठी मोठ्या 'अर्थ'पूर्ण घडामोडी झाल्याचे सांगितले जात आहे.