

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : अडीच वर्षाच्या महायुतीच्या सरकारने राज्य सरकारच्या धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेला राज्याचा वाटा दिल्यामुळे आज या रेल्वेमार्गाचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे लवकरच हे रेल्वे या मार्गावर धावताना आपणास पाहावयास मिळणार आहे असे उद्गार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काढले आहेत.
ठाकरे सरकारने राज्याच्या हिश्शयाचा वाटा न दिल्यामुळे रखडलेल्या धाराशिव-तुळजापूर- सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामाला आता मोठी गती आली आहे. धाराशिव-तुळजापूर या पहिल्या टप्प्यातील ३० किलोमीटर कामापैकी साधारण पणे ८ किलोमीटर अंतराचे काम मोठ्या वेगात सुरू आहे. जवळपास २५ टक्के काम पूर्णत्वाकडे आले असून या मार्गावर एकूण लहान-मोठे एकूण ५० पूल असणार आहेत. त्यापैकी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर १०६ मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल प्रस्तावित असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. या रेल्वे मार्गाच्या कामाची प्रगती सांगताना आमदार पाटील यांनी खोदकाम, भराव आणि पुलांच्या कामांना हाती घेण्यात आले आहे.
धाराशिव ते तुळजापूर या ३० किलोमीटर अंतरावर एकूण १७ मोठे पूल असणार आहेत. तर ३३ छोटे पूल साकारले जाणार आहेत. एकूण ५० छोटे-मोठे पूल ३० किलोमीटर अंतरावर आहेत. त्यात रेल्वे स्थानकाजवळ सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर १०६ मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या नकाशांचे काम अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यातील ३० किलोमीटरच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी ५४४ कोटी रूपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. या मार्गावरील अन्य पुलांच्या कामांना डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच हाती घेतले जाणार असल्याचेही अ.पाटील यांनी सांगितले. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या एकूण ८४ करण्यात आले आहेत. त्यात धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे केले आहेत. या रेल्वेमार्गावर एकूण ११० पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत.
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ३२ गावांतील एक हजार ३७५ एकर जमीन त्यासाठी भूसंपादीत करण्यात आली आहे. संपादीत जमिनीच्या वाढीव मावेजासाठी दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांची लवाद अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. धाराशिव-तुळजापूर या ३० किलोमीटर रेल्वेमार्गावर तीन नवीन रेल्वेस्थानके उभारली जाणार आहेत. धाराशिव ते सांजा या १० किलोमीटर अंतरावर सांजा येथे पहिले रेल्वे स्थानक असणार आहे. सांजा ते वडगाव या १२ किलोमीटर अंतराच्या टप्प्यावर दुसरे रेल्वेस्थानक तर वडगाव ते तुळजापूर या आठ किलोमीटर अंतरावर तिसरे स्थानक उभारले जाणार आहे. या रेल्वेमार्गावर एकूण चार स्थानके असणार आहेत. त्यात धाराशिव येथील सध्या अस्तित्वात असलेल्या मुख्य रेल्वेस्थानकाचाही समावेश आहे. मुख्य रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी नुकतेच नरेंद्र मोदी यांच्या सरकारने २१ कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केला असल्याचेही आ.पाटील यांनी सांगितले.
सध्या खोदकाम आणि भरावाचे काम वेगात सुरू आहे. नियोजित उद्दिष्टानुसार युध्द पातळीवर काम सुरू असल्याने पुढील आठवड्यापासून या मार्गावरील पुलांच्या कामांना सुरूवात होणार आहे. भरावानंतर ब्लँकेटींग त्यानंतर बलास म्हणजेच खडी अंथरण्याचे कामही हाती घेतले जाणार आहे. ते पूर्ण होताच स्लीपरच्या कामाला सुरूवात होईल. स्लीपरचे काम जसजसे पुढे जाईल, तसतसे रेल्वेची मुख्य पटरी अंथरण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.