

Dharashiv Ranks First in the State in the Chief Minister's Employment Scheme for the Fourth Consecutive Year
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा :
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्याने केवळ उद्दिष्टच पूर्ण केले नाही, तर सलग चौथ्या वर्षी १०० टक्क्यांहून अधिक यश मिळवणारा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा होण्याचा बहुमान पटकावला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा पाठपुरावा आणि प्रशासकीय यंत्रणेच्या समन्वयामुळे हे यशशिखर गाठले आहे.
चालु आर्थिक वर्षात धाराशिव जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत तब्बल १००७ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. ८०० चे लक्ष्य निर्धारित असतानाही १००७ प्रकरणे मंजूर करून जिल्ह्याने १२९ टक्के कामगिरी बजावली आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा उद्योग केंद्र आणि बँकिंग क्षेत्र यांच्या संयुक्त प्रयत्नांतून जिल्ह्यातील नवउद्योजकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
या यशात तेरणा जनसेवा केंद्राचा वाटा मोलाचा आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. किरण आवटे, प्रमोद सुतार आणि त्यांच्या टीमने जमिनीवर उतरून काम केले. जिल्ह्यात ७५० पेक्षा जास्त चर्चासत्रे आणि उद्योग शिबिरे घेऊन सरकारी योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवली. केवळ माहिती न देता ऑनलाइन अर्ज भरणे, बँकेकडून कर्ज मंजूर करून घेणे आणि अनुदान मिळेपर्यंत पूर्ण मदत केल्याने जिल्ह्यात उद्योजकतेची नवी लाट निर्माण झाली आहे.
३,१०० कुटुंबांना मिळाला आधार मागील चार वर्षातील कामगिरीमुळे जिल्ह्यात तब्बल ३,१०० नवीन उद्योजक तयार झाले असून, ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर करीत आहेत, या उपक्रमात लीड बैंक ऑफिसर श्री. पांडा यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अर्थसाहाय्य केले. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (उमेद) आणि महिला आर्थिक विकास महामंडळानेही (माविम) मोलाचे योगदान दिले आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे राज्याच्या औद्योगिक नकाशावर धाराशिवचे नाव आता ठळकपणे उमटले आहे.
कौशल्य व रोजगार मार्गदर्शन केंद्र, खादी ग्रामोद्योग विभाग, कत प्रकल्पामुळे जिल्ह्यात हजारो हातांना काम मिळाले आणि यांचेही या ऐतिहासिक गगनभरारीमध्ये मोठे योगदान राहिले आहे. जिल्हा उद्योग केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी बांधवांनी जिल्ह्यातील नव उद्योजकांना मोलाचे मार्गदर्शक केल्यामुळे सलग चार वर्ष धाराशिव जिल्हा राज्याच्या नकाशावर आपली ठळक कामगिरी सिद्ध करीत आला आहे.
या आहेच, त्यातून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही पुढील काळात मोठी गती प्राप्त होणार आहे. धाराशिव जिल्ह्याचे हे यश देदीप्यमान आहे. प्रशासनातील सर्व विभाग आणि बँकिंग क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच आपण नवउद्योजकांना बळ देऊ शकलो, भविष्यातही जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.