

Dharashiv News: Namaz-e-Istisqa for rain
वाशी, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिकांना पावसाची नितांत आवश्यकता असताना पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वाशी शहरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि. १८) पावसासाठी नमाज-ए-इस्तिस्का अदा करण्यात आली.
वाशी येथील तांदुळवाडी रोडवरील ईदगाह मैदानावर दुपारी अडीच वाजता विशेष नमाजचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमाज अदा केल्यानंतर अल्लाह तआलाकडे रहमत व भरपूर पावसासाठी सामूहिक दुआ करण्यात आली. यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने खरीप पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत असलेली पिके कोमेजण्याच्या मार्गावर असून, उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी शेती व्यवसायासमोर संकट निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाचा खंड आणखी वाढल्यास जनावरांच्या चारा-पाण्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे विविध समाजघटकांकडून पावसासाठी प्रार्थना केली जात आहे. नमाज-ए-इस्तिस्का ही पावसासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्याची विशेष मानली जाते. पावसाची कमतरता भासल्यास मुस्लिम समाजाकडून नमाज अदा करून दुआ केली जाते. वाशी येथेही शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवरील संकट दूर व्हावे आणि शेतीला नवसंजीवनी मिळावी, यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.