

Congress protest against the mandatory installation of smart meters
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविणे, वाढीव वीजबिलांच्या तक्रारी आणि सर्वसामान्य ग्राहकांवर होणाऱ्या आर्थिक भाराच्या निषेधार्थ धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्मार्ट मीटर सक्तीविरोधात आंदोलन करण्यात आले. काँग्रेस भवन ते महावितरण कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पूर्वीच्या तुलनेत अधिक वीजबिले येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून प्राप्त होत आहेत. वीज वापरात मोठा बदल नसतानाही बिल वाढल्याने गरीब, शेतकरी, कामगार, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला, लघु व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक भार पडत असल्याचे काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे.
मीटर रीडिंग व बिलाच्या गणनेबाबत पारदर्शकता नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला. ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविणे तत्काळ थांबवावे, सक्तीने बसविलेले मीटर काढून पूर्वीचे मीटर पुन्हा बसवावे, वाढीव बिलांची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करावी आणि चुकीची बिले रद्द करून फेरबिल द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करून चौकशी पूर्ण होईपर्यंत योजनेची अंमलब -जावणी स्थगित करावी, अशीही मागणी आहे. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला