

BJP leaders meet Shiv Sena leaders in the backdrop of municipal elections
भीमाशंकर वाघमारे
धाराशिव : नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील कलह थांबविण्यासाठी भाजपने एक पाऊल मागे घेतले आहे. मागील चार दिवसांत पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार तानाजी सावंत या शिवसेनेच्या (शिंदे गट) दोन नेत्यांची बैठक घेत, महायुती म्हणून आपण एकत्र राहण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
मागील पंधरा दिवसांत या दोन पक्षांत शहरातील रस्ते कामांच्या स्थगितीवरून वाद झाल्याने, पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचे कार्यकर्ते गोंधळात पडले होते, शहरातील नगरोत्थान योजनेंतर्गतच्या रस्ते कामांचा कार्यारंभआदेश आल्यानंतर भाजपचे आमदार राण जगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती जाहीर केली. या कामांच्या भूमिपूजनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना निमंत्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
त्यानंतर दोनच दिवसांत नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी या रस्ते कामांना स्थगिती दिली, पालकमंत्र्यांच्या सांगण्यानुसारच हे झाले. पालकमंत्र्यांचा गैरसमज ठाकरे शिवसेनेचे आमदार, खासदार यांनी करून दिला. त्यातूनच ही स्थगिती मिळाल्याची टीका भाजपकडून सुरू झाली. सोशल मीडियावर है वॉर तुफानी पद्धतीने सुरू झाले. त्यानंतर शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके, संघटक सुधीर पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले, परिणामी, निवडणुकीच्या तोंडावरच हे युद्ध सुरू झाल्याने महायुतीतील इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते गोंधळात पडले, "आता आपले कसे?" या विवंचनेत ते होते. नेत्यांच्या निवडणुकीत त्यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान केलेल्या कार्यकत्यांची घालमेल सुरू झाली.
दरम्यान, या स्थगितीला मुख्यमंत्री कार्यालयाकडून उठविण्याचे प्रयत्नही मधल्या काळात झाले. पण तिकडूनही "महायुतीतील संबंध कायम ठेवा," असा निरोप आल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला एक पाऊल मागे घ्यावे लागले. त्यातूनच जिल्हाप्रमुख दत्ता कुलकर्णी आणि ज्येष्ठ नेते नितीन काळे यांनी आमदार तानाजी सावंत यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर दोनच दिवसांत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही पुत्र मल्हार पाटील तसेच भाजप नेत्यांना सोबत घेत परिवहन व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची मुंबईत भेट घेतली. यामधून महायुतीत सारे काही आलबेल असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला.
त्यानंतर या दोन्ही पक्षांतील इच्छुकांचा जीव भांड्यात पडला असला, तरी ही दिलजमाई शुद्ध मनाने झाली आहे की शीतयुद्ध पुढे सुरूच राहणार, यावरच महायुतीतील पुढील गणिते अवलंबून रा हणार आहेत.