

भूम : तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अधिकृत उमेदवारांना झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची चिंतन बैठक १७ रोजी भूम येथे पार पडली. पक्षाला धोका दिलेल्या, काम न केलेल्यांवर कारवाईचे संकेत देण्यात आले.
या बैठकीत पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गणांतील उमेदवारांनी सहभाग घेतला. निवडणूक काळात स्वपक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम केल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करून आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिकांना बळ देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीस आष्टा जि.प. उमेदवार जिन्नत सय्यद, वालवडच्या उर्मिला वनवे, सुकट्याच्या लक्ष्मी जानकर, पाथरूडचे शंकर नागरगोजे तसेच विविध पंचायत समिती गणांचे उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षक सेना राज्य संघटक कोहिनूर सय्यद, विधानसभाप्रमुख प्रल्हाद आडागळे, माजी शहरप्रमुख दीपक मुळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. याबाबत जिल्हासंपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांनी दूरध्वनीद्वारे सांगितले की, निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते अंबादास दानवे व इतर पक्षश्रेष्ठींना देण्यात येणार आहे. संबंधितांवर पदावरून पायउतार करण्यासह संघटनात्मक पातळीवर आवश्यक ती कारवाई केली जाईल. निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय देण्याचा शब्दही त्यांनी दिला.
अन्यथा वेगळा विचार करण्याचा इशारा
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांना वाऱ्यावर सोडल्यामुळे पराभव पत्करावा लागला, अशी खंत बैठकीनंतर अनेक शिवसैनिकांनी व्यक्त केली. पक्ष नेतृत्वाने तत्काळ दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसैनिक वेगळा विचार करण्याच्या मार्गावर जातील, असा सूर बैठकीनंतर उमटला