उमरगा; पुढारी वृत्तसेवा : उमरगा शहरासह तालुक्यात मान्सूनपुर्व पावसाने वादळी वाऱ्यासह बुधवारी (दि.५) सायंकाळी जोरदार हजेरी लावली. सायंकाळी सातच्या सुमारास तासभर झालेल्या पावसामुळे भाजीपाला व्यवसायिकांसह व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र तासभर झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात एप्रिल महिन्यात दोन वेळा अवकाळी व मे महिना अखेरपर्यंत पाऊस झाला. दिवसाच्या कडक उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र आज सायंकाळी झालेल्या पावसामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपुर्व मशागतीची कामे करून ठेवली असून ते पावसाच्या प्रतीक्षेत होते. आज झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गही सुखावला आहे. पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणच्या गटारी तुडूंब वाहत होत्या. राष्ट्रीय महामार्गालगत मुख्य गटार नसल्याने अंतर्गत भागात असलेल्या गटारीचे पाणी रस्त्यावर साचले होते. याचा नाहक त्रास या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागला.
वादळी वाऱ्यासह पावसामुळे तालुक्यातील अनेक गावात झाडे उन्मळून पडली. तसेच शेतशिवारातील पत्रे उडून गेल्यामुळे आंबा, द्राक्षे, कांदे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहर परिसरात वादळी वाऱ्यामुळे विदयुत तारा तुटून पडल्या होत्या. यामुळे महावितरणाने रात्री वीजपुरवठा खंडीत केला.
हेही वाचा :