

75 thousand farmers will get 55 crores for Damages compensation
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा: खरीप २०२४ मधील काढणी पश्चात पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्यातील ७५६७७ शेतकऱ्यांना ५५ कोटी रुपये मिळणार असून यासाठी आवश्यक निधीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
खरीप हंगाम २०२४ मध्ये काढणीनंतर झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी आवश्यक असलेल्या राज्य शासनाच्या अंतिम हप्त्याच्या १००० कोटी रुपये निधीच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे.
यामुळे खरीप हंगाम २०२४ अंतर्गत काढणीपश्चात झालेल्या नुकसानी पोटी शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर रक्कम विमा कंपन्यांना वितरित केल्यानंतर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील ७८८१२ शेतकऱ्यांनी काढणी पश्चात नुकसानीच्या तक्रारी दिल्या होत्या. पंचनाम्याअंती यातील ७५६७७ पात्र शेतकऱ्यांना रु. ५५ कोटी वितरित करण्यात येणार आहेत.
ज्या अधिसूचित क्षेत्रात /मंडळामध्ये २५ टक्के पेक्षा जास्त तक्रारी आलेल्या आहेत, अशा क्षेत्रातील शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात प्रति हेक्टरी ६२०० ते रु. ६५०० रुपये तर इतर मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावरील पंचनाम्यानुसार झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रति हेक्टरी ८००० ते रु. ८५०० रुपये दरम्यान नुकसान भरपाई मिळेल, अशी अपेक्षा आहे. लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहील अशी माहिती आ. पाटील यांनी दिली.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत विमा कंपन्यांना देण्यात आलेल्या एकूण ७६०० कोटी रुपयांच्या हप्त्यातून, नुकसानभरपाई वगळता उरलेली रक्कम वजा करून २० टक्के रक्कम ही विमा कंपन्यांना दिली जाते. या प्रक्रियेतून उरलेले सुमारे २३०० कोटी हे राज्य शासनाला प्राप्त होणार आहे. ही रक्कम पुनश्च शेतकऱ्यांसाठीच वापरण्याचा राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व शिल्लक रकमेचा त्यांच्यासाठीच वापर ही प्रक्रिया दूरगामी व अत्यंत लाभदायक ठरणार आहे.