

21,793 farmers benefited from the loan waiver
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत राज्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर २४ ऑगस्ट रोजी ५ हजार ८६ कोटी ३० लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील २१ हजार ७९३ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर १८३ कोटी ८५ लाख ८९ हजार ९५६ रुपये जमा झाले आहेत.
यापूर्वी जिल्ह्यातील १२ हजार २१४ शेतकऱ्यांना १०५ कोटी ८६ लाख रुपयांचा लाभ मिळाला होता. नव्या लाभासह आतापर्यंत जिल्ह्यातील ३४ हजार ७ शेतकऱ्यांना एकूण २८९ कोटी ७२ लाख ४४ हजार ६६० रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. नव्याने लाभमिळालेल्यांमध्ये धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ हजार ३९८ शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांच्या खात्यावर ८ कोटी ३८ लाख ३९ हजार ७७३ रुपये जमा झाले आहेत-
४६ हजार ९१५ शेतकरी पहिल्या यादीत
योजनेला २ जून रोजी मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर १५ जुलै रोजी शासन निर्णय काढण्यात आला. राज्यातील ५३ बँकांनी सुमारे ३२ लाख कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली होती. त्यानुसार २५ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीत धाराशिव जिल्ह्यातील सुमारे ४६ हजार ९१५ थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.
आधार प्रमाणीकरण तातडीने करा
पहिल्या यादीतील ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप झालेले नाही, त्यांनी ते तातडीने पूर्ण करावे. प्रमाणीकरणानंतर त्यांच्या कर्जखात्यावर लाभाची रक्कम जमा केली जाणार आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादीही प्रसिद्ध होणार आहे. तसेच लाभमिळालेल्या शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.