

Youth injured in attack by friends dies during treatment
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नक्षत्रवाडीतील मैदानावर दारू पिऊन झालेल्या वादातून मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या दोन्ही आरोपींना सातारा पोलिसांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथून अटक केली आहे. विकी अशोक घनघाव (३१, रा. नक्षत्रवाडी) आणि दीपक कसबे (२८, रा. सातारा गाव) अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रकाश कैलास येडके (२८, रा. उस्मानपुरा) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
१९ जून रोजी आरोपी प्रकाशला घरून घेऊन गेले होते. तिथे दारू पिताना जुना वाद उफाळून आल्याने त्यांनी प्रकाशच्या डोक्यात वार केले. गंभीर जखमी प्रकाशचा ३ जुलै रोजी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपींचा माग काढत निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या पथकाने उज्जैनमध्ये त्यांच्या मुसक्या आवळल्या.
उज्जैनपर्यंत धडक कारवाई
दीपक हा उज्जैनला पळून गेल्याची माहिती मिळताच उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, हवालदार दिगंबर राठोड, सुनील बेलकर, सुभाष पाचे, आकाश पोलसाने आणि सुरेश काळे यांच्या पथकाने थेट उज्जैन गाठून रस्त्यातच बेड्या ठोकल्या. ५ जुलैला दीपकला तर ६ जुलैला विकी घनघावला पकडण्यात पोलिसांना यश आले. कसबे याला ८, तर घनघाव याला ९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
घाटीत नातेवाइकांचा संताप अन् लेखी आश्वासन
या प्रकरणी सुरुवातीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता, मात्र प्रकाशच्या मृत्यूनंतर त्यात खुनाचे कलम वाढवण्यात आले. प्रकाशचा मृत्यू झाल्याची बातमी धडकताच त्याचे नातेवाईक घाटी रुग्णालयात प्रचंड आक्रमक झाले. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी संताप व्यक्त केला. अखेर पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी स्वतः घाटीत धाव घेत नातेवाइकांची समजूत काढली आणि दोन दिवसांत आरोपींना अटक करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.