

Won't call off the hunger strike until permanent reservation is secured: Date Patil
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शाश्वत आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ज्येष्ठ आरक्षण अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी विभागीय आयुक्तालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा बुधवारी (दि. १२) चौथा दिवस होता. मराठा समाजाला कायदेशीर, घटनात्मक आणि न्यायालयीन कसोटीवर टिकणारे शाश्वत आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार दाते पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
उपोषणाच्या पहिल्या दिवसापासून समाजासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, विविध संघटना तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन दाते पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. आरक्षणाच्या लढ्यात कायम सोबत राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे.
हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे मराठा-कुणबी नोंद अथवा वंशावळ नसलेल्या मराठा बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी प्रमुख मागणी आहे.
तसेच एसईबीसी प्रवर्गाला ओबीसीप्रमाणे शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती, शुल्क सवलत व शासकीय योजनांचा लाभ द्यावा, आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घ्यावेत, सारथी संस्थेला पाच हजार कोटी, तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला दहा हजार कोटींचा निधी द्यावा, प्रलंबित उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात आणि कायगाव येथे मराठा हुतात्मा स्मारक उभारावे, अशा मागण्या दाते पाटील यांनी मांडल्या आहेत.
समाजाच्या पदरात शाश्वत आरक्षण टाकणार
दरम्यान, उपोषणाचा चौथा दिवस उलटूनही प्रशासनाकडून चर्चेसाठी अद्याप कोणी आलेले नाही, असा दावा दाते पाटील यांनी केला. प्रशासन किंवा सरकारने कितीही मनमानी केली तरी मराठा समाजाच्या पदरात शाश्वत आरक्षण टाकल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा पुनरुच्चाराही त्यांनी केला.