

Where did our votes go? - Sujat Ambedkar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक २४ मधील संजयनगर-मुकुंदवाडी परिसरातील जनतेने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मते दिली. तरीही त्यांचा पराभव झाला. मग या मतदारांनी दिलेली मते गेली कुठे असा प्रश्न गुरुवारी (दि.५) सुजात आंबेडकरांनी उपस्थित करत ईव्हीएम मतदान प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केल्या.
वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी संजयनगर-मुकुंदवाडी परिसरातील मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी ईव्हीएम मतदान प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केल्या. वंचित बहुजन आघाडीला मतदान केले; मात्र मतमोजणीत ते प्रतिबिंबित झाले नसल्याचा आरोप यावेळी केला. ईव्हीएममधील मते पारदर्शकपणे मोजली गेली असती, तर वंचितचे पॅनल विजयी झाले असते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आवाहन कथित मतदान अपहाराच्या निषेधार्थ मतदारांनी एफिडेविट सादर करण्याचे आवाहन केले. मोठ्या संख्येने प्रतिज्ञापत्रे दाखल झाल्यास निवडणूक आयोग व प्रशासनाला उत्तर द्यावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हा प्रश्न पराभवाचा नसून लोकशाही मूल्यांचा असल्याचे सांगत, शांततामय आंदोलन व लोकशाही मागनि लढा उभारण्याचे संकेत त्यांनी दिले. यावेळी सतीश गायकवाड, करुणा जाधव, प्रेम चव्हाण, जफरभाई, बबन कदम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.