

Water Supply Scheme: Increased supply to the city again from next week
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पाणीपुरवठा योजने अंतर्गत नक्षत्रवाडी येथील पंपिंग हाऊसमध्ये पावसामुळे निर्माण झालेल्या गळतीच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. येत्या चार ते पाच दिवसांत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. जुलैअखेरीस १५०० मिमी जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार असून, मुख्य जलवाहिनीतील २५ निकामी बटरफ्लाय व्हॉल्व्हही बदलण्यात येणार आहेत. त्यानंतर चाचणी पूर्ण करून पुढील आठवड्यापासून शहराला पुन्हा वाढीव पाणीपुरवठा सुरू केला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी शुक्रवारी (दि.३) पत्रकार परिषदेत दिली.
नवीन योजनेतून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत शहराला सुमारे १५० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळाले होते. मात्र, २४ जून रोजी झालेल्या पावसामुळे नक्षत्रवाडीतील पंपिंग हाऊसच्या इमारतीच्या स्लॅबमध्ये गळती सुरू झाली. त्यामुळे इलेक्ट्रिकल पॅनलमध्ये पाणी शिरल्याने शॉर्टसर्किटचा धोका निर्माण झाला. यावर खबरदारीचा उपाय म्हणून पंपिंग तात्पुरते बंद करण्यात आले होते. त्यानंतर या स्लबच्या वॉटरप्रूफिंग आणि विद्युत यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
तसेच मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीदरम्यान फ्लो मीटर बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून मुख्य जलवाहिनीची तपासणी करण्यात आली. त्यात ८७ एअर व्हॉल्व्हपैकी २५ बटरफ्लाय व्हॉल्व्हच्या झडपा व्यवस्थित कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जलवाहिनीतील हवा बाहेर पडत नव्हती हा दोष मान्य करत संबंधित कंत्राटदार कंपनीने सर्व निकामी व्हॉल्व्ह बदलण्याची तयारी दर्शविली असून त्याचेही काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे.
हायड्रॉलिक चाचण्या, गॅप जोडणीसह क्रॉसिंगची कामे
पंपिंग पूर्ववत झाल्यानंतर जुलैच्या अखेरीस १५०० मिमी व्यासाची डीआय जलवाहिनीही कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. त्याआधी जलवाहिनीची स्वच्छता, हायड्रॉलिक चाचण्या, गॅप जोडणी आणि क्रॉसिंगची कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यानंतर हर्सल ते जटवाडा परिसरापर्यंत नव्या जलवाहिनीतून नियमित पाणीपुरवठा सुरू होईल.
दुरुस्तीनंतर विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत
नक्षत्रवाडी पंपिंग हाऊसवरील काम पूर्ण होताच वाढीव पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेले पाणीवाटप सुरळीत होऊन शहरातील पाणीटंचाईत मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.