

Voting continued until late at seven polling stations
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी सरासरी ८० टक्के मतदान झाले. बोगस मतदान, मतदानाचे अधिकारपत्र यावरून अनेक केंद्रांवर बाचाबाचीच्या घटना घडल्या. शाब्दिक चकमक, बाचाबाचीचे वाद वगळता मतदान शांततेत पार पडले. सात मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या.
तब्बल नऊ वर्षांनंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक होत असल्याने नेते, कार्यकर्ते, मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. शनिवारी (दि. ७) मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. मतदार स्वयंस्फूर्तीन मतदान करण्यासाठी आल्याचे चित्र पहायला मिळाले.
पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने मतदान केंद्रांबाहेरच्या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. तालुक्यात काही मतदान केंद्रांबाहेर उमेदवार, कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाचीच्या घटना वगळता मतदान शांततेत पार पडले.
अजिंठ्यात अर्धा तास उशिराने मतदान
तालुक्यातील अजिंठा, शिवणा, घाटनांद्रा, गेवराई सेमी, बोरगाव सारवणी, अंधारी, डोंगरगाव आदी ठिकाणी उशिरापर्यंत मतदान सुरु होते. अजिंठ्यात एका केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्याने सकाळी अर्धातास उशिराने मतदान प्रक्रिया सुरु झाली. काही केंद्रांवर मतदान यंत्रे हळू चालल्याने मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, अजिंठा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रियेदरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता.