

Uddhav Thackeray's response to Chief Minister Devendra Fadnavis' criticism
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मी आरशात बघतो, तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा. मी काय केले, तुम्ही काय केले हे बघण्याची ही वेळ नाही. राज्यातील शेतकरी संकटात असल्याने त्याला भरीव मदत करा, पंजाब सरकारने जसे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये दिले तशी मदत द्या अशा शब्दात शिव सेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले.
उद्धव ठाकरे यांनी हंबरडा मोर्चानंतर पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी हंबरडा मोर्चा काढण्याआधी स्वतः आरशात बघावे, असे फडणवीस म्हणाले होते.
त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, सध्या राज्यातील शेतकरी संकटात आहे. मी काय केले, तुम्ही काय केले याची चर्चा करण्याची ही वेळ नाही. मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. केवळ पिकेच नाही तर जमिनीदेखील खरडून गेल्या आहेत. तो स्वतः उभा राहू शकत नाही. त्याला भरीव मदतीची गरज आहे. तिकडे पंजाब सरकार मदत करू शकते, मग तशी मदत राज्यातील सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना द्यावी, संपूर्ण कर्जमुक्ती करावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
लोकांना कर्जमाफीचा नाद लागला असल्याचे असंवेद-नशील वक्तव्य सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले, नाद हा शब्द कशाशी संबंधित असतो हे त्यांना ठाऊक असले पाहिजे. त्यांची मानसिक स्थिती तपासण्याची गरज आहे. अशा मानसिकतेचे लोक सरकारमध्ये बसले असतील तर ते लोकांचे काय भले करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शिंदेंचा गद्दार म्हणून उल्लेख
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ठाकरे कितीवेळा हंबरडा फोडणार, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर फोडला आणि आता मुंबई महापालिका निवडणुकीनंतरही त्यांना पुन्हा हंबरडा फोडायचा आहे, असे शिंदे म्हणाले होते. त्याबद्दल विचारले असता ठाकरे म्हणाले, मी याआधीही म्हणालो होतो, मी गद्दारांना उत्तर देत नाही. त्यांची ती पात्रता नाही.