वरठाण : हनुमंतखेडा (ता.सोयगांव) येथे शेतामधून घरी जाताना अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. यामध्ये आश्विनी मच्छिंद्र राठोड (वय.१४ रा.हनुमंतखेडा) तसेच बकऱ्यांना चरवण्यासाठी गेलेल्या अजय नथ्थु राठोड (वय १६,रा.बोरमाळ तांडा) या तरुणासह आठ बकऱ्यांच्या वीज पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.21) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
बनोटी परिसरातील गेल्या दहा दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. सकाळ पासुन पाऊस विश्रांती घेत दुपारी दोन वाजेपासुन विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. हनुमंतखेडा शिवारातील गट क्रमांक १२९ मध्ये कापुस वेचताना अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने आई वडील व मुले घरी जात होती. यावेळी आश्विनी सर्वात पुढे होती. यावेळी चालत जाताना अचानकपणे वीज पडली. यामध्ये अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. या बरोबरच बोरमाळ तांडा येथील अजय नथ्थु राठोड हे सकाळी दहा वाजता नेहमी प्रमाणे बकऱ्या घेऊन जंगली कोठा शिवारात चारण्यासाठी घेऊन गेला होता. यावेली बकऱ्या चारत असतांना अचानक वीज कोसळली यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर आठ शेळ्या ही वीजेचा धक्का बसून मृत्यू झाला. शिवारातील मजुर धावत जाऊन बघितले असता हा प्रकार लक्षात आला.
यानंतर दोघांनाही बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.रब्बानी शेख यांनी तपासून मृत घोषित केले. त्याच्यावर बनोटी येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. बनोटी दुरक्षेत्रात दोन्हीही घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे