

Traffic jam on the road leading to Verul Caves and Ghrishneshwar Temple
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेरूळच्या प्रसिद्ध लेण्या, भारतातील बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन, उत्तर भारतीयांचा श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व आणि पावसानंतर बहरलेले निसर्गसौंदर्य यामुळे वेरूळ परिसरात पर्यटक व भाविकांची मोठी गर्दी होत आहे. वाढत्या गर्दीच्या तुलनेत वाहतूक व्यवस्थेचे नियोजन होत नसल्याने वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर आणि भोसले चौक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असून, पर्यटक व भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शनिवार-रविवारची सुटी, सलग दोन दिवसांच्या पावसानंतर खुललेले वातावरण आणि श्रावण महिन्याची सुरुवात यामुळे राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक व भाविक वेरूळमध्ये दाखल झाले आहेत. वेरूळच्या जागतिक कीर्तीच्या लेण्या, कैलास लेण्याचे अप्रतिम शिल्पवैभव, बौद्ध, हिंदू आणि जैन लेणींचा ऐतिहासिक वारसा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने देशी विदेशी पर्यटक येथे येतात. त्याचबरोबर भगवान घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांचीही मोठी गर्दी होत आहे.
पावसानंतर प्रसिद्ध सीताची न्हाणी धबधबा तसेच परिसरातील अनेक छोटे-मोठे धबधबे ओसंडून वाहत असून, हिरवाईने नटलेले डोंगर पर्यटकांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे पर्यटन आणि धार्मिक पर्यटनाचा दुहेरी ताण या परिसरावर निर्माण झाला आहे. अनेक बाहेरगावचे पर्यटक पार्किंगची माहिती नसल्याने रस्त्याच्या दुतफ वाहने उभी करतात.
परिणामी मुख्य रस्ता अरुंद होऊन काही मिनिटांतच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात विशेष म्हणजे, वाहतूक पोलीस कर्मचारी अपुऱ्या संख्येने दिसून येत असल्याने किंवा योग्य नियोजनाचा अभाव असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक त उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे.