

water storage Jayakwadi Dam increasing inflow water Godavari
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : उर्ध्व गोदावरी खोऱ्यातून दाखल होणाऱ्या पाण्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या चार दिवसांत धरणातील पाणीसाठ्यात सुमारे ६ टक्क्यांहून अधिक वाढ होऊन उपयुक्त साठा ३५.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या नागमठाणा येथून जायकवाडीत १६ हजार क्युसेकने पाणी दाखल होत आहे.
काही दिवसांपासून नाशिक परिसरात सातत्याने मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे वरच्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा होऊन त्यातून खाली विसर्गही करण्यात येत आहे. यंदा मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पैठण येथील जायकवाडी धरणातील पाणीसाठा २९ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. परंतु आता उर्ध्व गोदावरी पात्रातून जायकवाडीत पाण्याची आवक होत आहे.
त्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी जायकवाडी धरणात २९.०६ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. रविवारी हा साठा ३२.५९ टक्क्यांवर पोहोचला. सोमवारी त्यात आणखी २ टक्क्यांची भर पडून तो ३४.३२ टक्क्यांवर गेला.
तर मंगळवारी हा साठा ३५. ५९ टक्के झाला आहे. नागमठाण येथून जायकवाडी धरणाच्या दिशेने १६ हजार ४०० क्युसेकने पाणी दाखल होत आहे. उर्ध्व गोदावरी खोर्यातील दारणा, गंगापूर, कडवा, नांदूर मधमेश्वर बंधारा, देवगड आणि नागमठाणा या प्रकल्पांमधून अत्यल्प प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जायकवाडी धरणाच्या उपयुक्त साठ्याची एकूण क्षमता ही २१७० टक्के इतकी आहे. गतवर्षी आजच्या तारखेला म्हणजे २१ जून २०२४ रोजी धरणात केवळ ४.९६ टक्के इतकाच साठा शिल्लक होता.