

The Municipal Corporation's first general body meeting is today
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील साडेपाच वर्षांच्या प्रशासक राजनंतर आज (दि. २७) लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पहिलीच सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत प्रशासनाकडून काही प्रस्ताव मंजुरीस्तव ठेवले आहेत, परंतु या विषयाऐवजी नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरूनच सभा वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे. त्याचा अंदाज महापौर समीर राजुरकर यांच्यासह प्रशासनालाही आला आहे. त्यामुळे गोंधळी नगरसेवकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
महापालिकेत तब्बल साडेपाच वर्षे प्रशासकीय कारभार सुरू होता. या कार्यकाळात अनेक माजी नगरसेवक आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि प्रशासन यांच्यात काही कारणाने वादंग झाले आहेत. मग अतिक्रमण असो की, विकासकामे यावरून खटके उडालेले असून, त्याचा वचपा (आता निवडून आलेल्या नगरसेवकांनी) घेण्याची तयारी केली आहे. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक ५६ नगरसेवक भाजपचे आहेत, तर दुसरया क्रमांकावर एमआयएम असून, त्यांचे ३३ नगरसेवक विजयी झाले आहेत.
महापालिकेवर पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेची सत्ता आली आहे. एमआयएम यंदाही गेल्यावेळीप्रमाणे विरोधी बाकावर आहे. सत्ता स्थापनेनंतर पहिलीच नियमित सर्वसाधरण सभा आज (दि. २७) होत आहे. या सभेत महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासाठी वाढीव छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर अंदाजपत्रकाच्या मंजुरीचा प्रस्ताव आहे.
त्यासोबतच शहरातील रस्ते खड्डेमुक्त ठेवण्यासाठी विशिष्ट बनावटीच्या डांबर खरेदीचा वार्षिक करार करण्याबाबतचा प्रस्ताव आहे. तर विविध नगरसेवकांनी विविध ३९ प्रश्न मांडले असून, त्यात अधिकास्यांच्या नियुक्तीसह त्यांना दिलेल्या मुदतवाढीवर शंका उपस्थित करणारे प्रश्न आहेत. त्यासोबतच नगररचना विभागाने मंजुरी दिलेल्या रेखांकन आणि जागेच्या कराराबाबतचेही प्रश्न आहेत. एकूणच प्रशासनाला धारेवर धारणारे हे प्रश्न असून, त्यावरून सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
गोंधळी नगरसेवकांवर होणार कारवाई
महापौर समीर राजुरकर यांनी सभेचे कामकाज नियमानुसार चालविण्यात येईल, असे अगोदरच स्पष्ट केले आहे. त्यानुसार विषय पत्रिकेवरील विषयावरच चर्चा होणार असून, कोणीही ऐनवेळी विषय उपस्थित करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलाच तर त्या नगरसेवकावर कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर राजुरकर यांनी दिला आहे.