

The craze for pickles remains, even without the rain
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पाऊस नसला अन् वातावरणात उकाडा असला तरी लोणच्याची क्रेझ आणि मागणी गृहोद्योगाकडे कायम आहे. मात्र सध्या वातावरण हे उष्णच आहे आणि लोणचे टिकवण्यासाठी थंड वातावरण हवे असते अन्यथा ते खराब होते, त्यामुळे लोणचे नासू नये म्हणून गृहोद्योग चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. घरातील ज्या खोलीत लोणचे ठेवले आहे, ती खोली थंड ठेवावी लागत असल्याचे गृहोद्योजिका तिलोत्तमा दिवटे यांनी सांगितले.
पावसाळ्यात मसालेदार, चटपटीत पदार्थ खाण्याची लोकांची आवड वाढते आणि भूक वाढवण्यासाठी लोणचे उत्तम पर्याय ठरते. तसेच सणासुदीचे दिवस किंवा भाजी नसताना जेवणाची चव वाढवण्यासाठी लोणच्याला नेहमीच पसंती मिळते.
जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला की लगेच लोणचे भरण्यासाठी महिलांची लगबग सुरू होते. मात्र यंदा जून महिना संपत आला तरी पाऊस न आल्याने वातावरणातील उकाडा कायम आहे. त्यामुळे उष्णतेने लोणचे नासेल म्हणून बहुतांश महिलांनी अजुनही लोणचे भरण्यास सुरूवात केलेली नाही.
घरात लोणचे भरत नसल्या तरी बचतगट व गृहोद्योगांकडे मागणी कायम आहे. मात्र ज्या महिला तीन ते चार किलो लोणचे विकत घेत होत्या त्या आता केवळ एक किलोच लोणचे विकत घेत आहे. कारण उष्ण वातावरणाने लोणचे खराब होण्याची भीती आहे.
गूळ-आंबा नाही मात्र साखर-आंब्याला मागणी
बाजारात कैरी विक्रीसाठी येत असल्याने लोणच्या बरोबरच साखर-आंबा बनविण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र गूळ-आंबा हा उष्ण वातावरणात खराब होत असल्याने गूळ-आंबा बनविला जात नाही.
कैरी महागणार
सध्या लोणच्याच्या कैरीची आवक बाजारात वाढली असून, त्याचे भाव 50 ते 60 रुपये किलो आहेत. उष्ण वातावरणामुळे महिला ही कैरी विकत घेत नाही, मात्र पाऊस पडल्यावर हे भाव 80 ते 90 रुपये किलो होण्याची शक्यता आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.