

The Chhatrapati Sambhajinagar, Jalna, and Nanded municipal corporations are with the BJP
छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा
मराठवाड्यातील पाच महापालिकांपैकी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड या तीन महापालिकांत भाजपाने सर्वाधिक व बहुमतासाठी आवश्यक जागा जिंकत सत्तासूत्रे आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. लातूर, परभणीत मात्र भाजपाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. परभणीत उबाठाने तर लातूरला काँग्रेसने भाजपची घोडदौड रोखली.
राज्याच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या छत्रपती संभाजीनगरात भाजप 30 ते 35 जागांपर्यंत मजल मारेल, अशी अपेक्षा असताना पक्षाने सर्व्हे आणि राजकीय निरीक्षकांचे अंदाज चुकवित 115 पैकी 58 जागांवर विजय मिळविला. संभाजनीगरात भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. असे असतानाही मतदारांनी भाजपाला कौल दिला हे विशेष.
भाजपचे नेते अनिल मकरीये, समीर राजूरकर, माधुरी अदवंत, राजू वैद्य, सविता कुलकर्णी, सुरेंद्र कुलकर्णी, शिवाजी दांडगे आदी विजयी झाले आहेत. शिंदे सेनेने 14 जागा जिंकल्या असून, उमेदवार व मंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट, पुत्र सिद्धांत, माजी महापौर त्र्यबंक तुपे, अनिता घोडेले, ऋषीकेश जैस्वाल, राजेंद्र जंजाळ हे विजयी झाले.
उबाठाने सहा जागी बाजी मारली असून, रशीद मामू हे विजयी झाले तर अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे पराभूत झाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नवीनसिंग ओबेरॉय यांनी माजी उपमहापौर संजय जोशी यांना अल्पशा मतांनी पराभूत केले.
जालन्यात सुस्पष्ट कौल
जालना शहराला महापालिकेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाली. या निवडणुकीत 65 पैकी 41 जागांवर विजय मिळवित भाजपने वर्चस्व राखले आहे. माजी मंत्री रावसाहेब दानवे, कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणूक लढविली होती. शिंदे सेनेचे नेते आ. अर्जुन खोतकर यांनी प्रयत्नांची पराकष्ठा करूनही या पक्षाला केवळ 12 जागा, तर काँग्रेसला 9 ठिकाणी विजय मिळाला आहे. जालना हा शिवसेनेचा बालेकिल्ला ओळखला जात असे. काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि सेनेचे अर्जुन खोतकर असाच सामना येथे होत असे. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर गोरंट्याल यांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे या ठिकाणी भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे.
परभणीत उबाठाचा झेंडा
अत्यंत चुरशीच्या झालेल्या परभणीच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला तब्बल 25 तर काँग्रेसला 12 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल 27 मुस्लिम उमेदवार देत मुस्लिम मतांवर डोळा ठेवला होता, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची ही रणनीती यशस्वी ठरली नसल्याचे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे. शिवसेना शिंदे गटाने 35 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते, परंतु त्यांना खातेही उघडता आलेले नाही.
लातुरात काँग्रेसचे वर्चस्व
लातुरात काँग्रेसने भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाची धूळ चारत 47 जागा जिंकून एकहाती बहुमत मिळविले आहे. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी निवडणुकीची एकहाती सूत्रे घेऊन भाजपला 22 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका जागेवर रोखले. लातूर महानगरपालिकेची निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी झाली. त्यात काँग्रेसचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून ही निवडणूक तिरंगी केली होती. परंतु राष्ट्रवादीला विक्रांत गोजमगुंडे यांच्या रूपाने केवळ एकच जागा जिंकता आली.
नांदेडातही भाजपाचा बोलबाला
नांदेड महापालिकेत भाजपाचा बोलबाला राहिला. काँग्रेस आणि वंचितने एकत्र येत भाजपाला आव्हान दिले होते. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने ही निवडणूक लढविली. अलीकडेच झालेल्या नगरपरिषद निवडणुकत भाजपाला समाधानकारक यश न मिळाल्याने नांदेडच्या निकालाविषयी औत्सुक्य होते. चव्हाण यांनी आपले प्रभूत्व सिद्ध करीत नांदेडवर भाजपाचा झेंडा उभारला आहे.
नांदेडची मतमोजणी संथ गतीने सुरू असून, सायंकाळपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 81 पैकी 47 जागी भाजपने बाजी मारली आहे. एमआयएम 13 जागी विजय मिळविला आहे. या निवडणुकीत एमआयएम आणखी जागा मिळविल अशी अपेक्षा असताना या पक्षाला मात्र पुरेशा जागा मिळाल्या नाहीत.