

The businessman was thrown into the Chalisgaon ghat for ₹1 crore.
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातील बोदवड येथील भुसार मालाचे व्यापाऱ्याचा अपहरणाचा शेवट अखेर हत्याकांडाने झाला. बेपत्ता व्यापाऱ्याचा मृतदेह सोमवारी (दि.२९) पहाटे तुकाराम गव्हाणे चाळीसगाव घाटातील दरीत सापडला.
तालुक्यातील उंडणगाव येथून ते शनिवारी (दि. २७) रात्री घरी बोदवड येथे परत जाताना बेपत्ता झाले होते. मुलाकडे फोनवरून एक कोटीची मागणी केल्याने अपहरणाचा संशय बळावला होता. यामुळे अजिंठा, वडोदबाजार, सिल्लोड ग्रामीण व गुन्हे शाखेचे दोन असे पोलिसांचे पाच पथक या घटनेचा तपास करीत होते. या तपासादरम्यान रविवारी (दि.२९) रात्री पोलिसांनी आरोपींनी पकडले व व्यापाऱ्याला घाटात फेकल्याचे समोर आले. या खुनाच्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी कारसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
तुकाराम माधवराव गव्हाणे (५५, रा. बोदवड) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. तर वैभव समाधान रानगोते (२२), सचिन नारायण बनकर (२५) रा. गोळेगाव. अजिनाथ ऊर्फ अजय रखमाजी सपकाळ (२२, रा. पालोद), विशाल साहेबराव खरात (२३, रा. पानवडोद), दीपक कन्हैयालाल जाधव (२५, रा. लिहाखेडी) असे या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
व्यापारी तुकाराम गव्हाणे यांचे बोदवड गावात कृषी सेवा केंद्र आहे. शिवाय ते भुसार मालाचेही व्यापारी आहे. शनिवारी (दि. २७) दुपारी ते दुचाकीने (एमएच- २०, जीएफ ०४४३) उंडणगावला आले होते. एका व्यापाऱ्याकडून रक्कम घेऊन घरी निघाले. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचले नाही. मुलांनी वारंवार फोन केला. मात्र मोबाईल बंद येत होता. दिवस निघाला तरी घरी न आल्याने मुले नातेवाइकांसह उंडणगावला आले. मात्र शोध लागला नाही. या दरम्यान त्यांच्या मुलाला वडिलांच्या मोबाईलवरून फोन आला व माझे अपहरण झाले. बसस्थानक परिसरात एक कोटी रुपये घेऊन ये, असे सांगितले. तर काही तासांनंतरच बेपत्ता व्यापाऱ्याने काकाला फोन करीत दोन कोटी घेऊन या, असे सांगितले.
फोन करून दोन वेळा व्यापाऱ्याने मोठ्या रकमेची मागणी केल्याने घरच्यांना त्यांच्या अपहरणाचा संशय बळावला. यामुळे मुलांनी अजिंठा पोलिस ठाणे गाठत बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी ही माहिती वरिष्ठांना देत तातडीने तपास सुरू केला. रविवारी अजिंठा, सिल्लोड ग्रामीण, वडोदबाजार व गुन्हे शाखेचे दोन असे पाच पथक तपास करीत होते. या तपासादरम्यान रविवारी रात्री आरोपींना कारसह छत्रपत्ती संभाजीनगरजवळील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावरून पोलिसांनी ताब्यात घेतले व घटनेचे गूढ उकलले. या प्रकरणी आरोपीविरोधात अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारा तासांत आरोपींना बेड्या
या घटनेचा तपास अजिंठा, वडोदबाजार, सिल्लोड ग्रामीण व गुन्हे शाखेचे दोन अशा पाच पथकांनी केला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, नाकाबंदी करीत वाहनांनी तपासणी व तांत्रिक बाबी तपासत बारा तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या. मात्र व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना अपयश आले.
आरोपींना पोलिस कोठडी
आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश सिल्लोड न्यायालयाने दिले, अशी माहिती अजिंठा पोलिसांनी दिली. दरम्यान, व्यापा-यावर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर समाज मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपहरणाचा पूर्वनियोजित कट
आरोपी व्यापाऱ्याला चांगले ओळख होते. व्यापारी श्रीमंत असल्याने आरोपींनी अपहरण करून मोठी रक्कम मागायची, असा पूर्वनियोजित कट रचला. व्यापाऱ्यावर पाळत ठेवून शनिवारी रात्री घरी जात असताना रस्त्यातील खंडाळा फाट्यावर अडवले व कार (एमएच- २०, एचएच ०९७०) मध्ये कोंबले. व्यापाऱ्याच्या डोळ्यांवर रुमाल बांधून चार जण अंभई, भराडीमार्गे सिल्लोडजवळील सूतगिरणीच्या मैदानावर येऊन थांबले.
तर एक जण हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गावाकडे परत गेला. रविवारी सकाळी व्यापाऱ्याला त्यांच्या फोनवरून मुलाला फोन करायला लावला व एक कोटी घेऊन येण्याचे सांगितले. यानंतर एक जण व्यापाऱ्याचा फोन घेऊन छत्रपती संभाजीनगरला गेला. तर तिघे कारमध्ये व्यापाऱ्या घेऊन कन्नडकडे गेले.
तिकडे एक जण छत्रपती संभाजीनगरहून मुलाला फोन करून पैसे घेऊन कुठपर्यंत आला, याची माहिती घेत होता. तर तिघे व्यापाऱ्याला सोबत घेऊन कन्नडजवळ थांबले होते. तर गावाकडे थांबलेला एक आरोपी इकडची माहिती त्यांना देत होता. या सर्व घटनेदरम्यान आता आपल्याला पैसे तर मिळणार नाही. शिवाय बदनामी होईल व पोलिस पकडतील, अशी खात्री झाल्याने आरोपींनी व्यापाऱ्याला चाळीसगाव घाटातील म्हसोबा महाराज मंदिराजवळील खोल दरीत फेकल्याची माहिती सूत्रांनी दिली.