

Thackeray Sena rings bells to protest against embezzlement of Shri Ram Temple donations
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगीत कथित अपहार झाल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने रविवारी (दि.५) छत्रपती संभाजीनगरातील गुलमंडी येथील सुपारी हनुमान मंदिरात 'श्रीराम रक्षा घंटानाद' आंदोलन करण्यात आले. यावेळी घंटानाद, महाआरती, सामूहिक हनुमान चालीसा पठण आणि भजन कार्यक्रमाद्वारे निषेध नोंदविण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार आणि आमदार अंबादास दानवे यांच्या संयोजनाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसैनिक व रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. मंदिर परिसरात 'जय श्रीराम' सह विविध घोषणाबाजी करण्यात आली. प्रभू श्रीरामांच्या श्रद्धेचा आणि रामभक्तांच्या विश्वासाचा अपमान सहन केला जाणार नसल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
आंदोलनादरम्यान सामूहिक हनुमान चालीसा पठणानंतर गणराय, भगवान शंकर-पार्वती तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची आरती करण्यात आली. त्यानंतर विविध महिला भजनी मंडळांनी श्रीरामावरील भजने, अभंग आणि गवळणी सादर केल्याने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक घंटा घेऊन जोरदार घंटानाद केला. श्रीराम मंदिर देणगीतील प्रत्येक रुपयाचा हिशेब जनतेसमोर मांडावा, कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते सुभाष पाटील, डॉ. संजयसिंह कच्छवे, जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, उपजिल्हाप्रमुख संतोष खेडके, हिरा सलामपुरे, किशोर हिवाळे, दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभाप्रमुख प्रमोद ठेंगडे, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, वीरभद्र गादगे, गिरीश चपळगावकर, तालुकाप्रमुख विष्णू जाधव, आनंद भालेकर, मनपा गटनेते गणेश लोखंडे, नगरसेवक राशीद मामू यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, विविध भजनी मंडळांचे सदस्य तसेच रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित
आंदोलनातून प्रमुख मागण्या
* श्रीराम मंदिर देणगीतील प्रत्येक रुपयाचा हिशेब सार्वजनिक करावा. * कथित अपहाराची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करावी. * गैरव्यवहारात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. * श्रीराम मंदिरावरील भाविकांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी पारदर्शकता राखावी. * मंदिर निधीच्या वापराबाबत नियमित माहिती जनतेसमोर जाहीर करावी.