

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नो-नेटवर्क भागांमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांची पाण्यासाठीची प्रतीक्षा अखेर संपण्याची चिन्हे आहेत. नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहराला पाणी मिळण्यास सुरुवात होताच या भागांमध्ये तातडीने नळकनेक्शन देण्याचे आदेश मंगळवारी (दि.१६) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे वर्षांपासून अनेक नियमित पाणीपुरवठ्यापासून वंचित असलेल्या वस्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहराला टप्प्याटप्प्याने १०० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. मंगळवारी नक्षत्रवाडी येथील एमबीआरमधून पाणीपुरवठ्यास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला मर्यादित प्रमाणात पाणी घेतले जात असले तरी आगामी काळात त्यात वाढ करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीद्वारे नक्षत्रवाडी ते हसूल-जटवाडा या भागात पाणी पोहोचविले जाणार आहे.
यासंदर्भात आयुक्त येडगे यांनी पाणीपुरवठा विभागाची विशेष बैठक घेऊन नो-नेटवर्क भागांतील नळजोडणीचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. मनपाकडे उपलब्ध असलेल्या सुमारे ४५ हजार नळजोडणी साहित्याचा वापर करून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच नळजोडणीची जबाबदारी महापालिकेच्या प्लंबरांकडे सोपविण्यात आली आहे. तसेच नळजोडणी शुल्क निश्चित करून त्याची ऑनलाइन वसुली करण्याचे नियोजनही प्रशासनाने सुरू केले आहे.
दहा जलकुंभ क्षेत्रांतील नागरिकांना लाभ
गरवारे स्टेडियम, हर्मूल, दिल्लीगेट, केटली गार्डन, पारिजातनगर, शाक्यनगर, भावसिंगपुरा, एसएफएस, हरिओमनगर आणि आमेरनगर जलकुंभ क्षेत्रातील नो-नेटवर्क भागांना नव्या योजनेतून नळकनेक्शन दिले जाणार असून हजारो कुटुंबांना नियमित पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे.
४५ हजार नळजोडण्या देण्याची तयारी
नो-नेटवर्क भागांमध्ये जलदगतीने नळकनेक्शन देण्यासाठी महापालिकेकडे ४५ हजार जोडण्यांचे साहित्य उपलब्ध आहे. उपलब्ध साहित्याचा तातडीने वापर करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आदेश आयुक्त अमोल येडगे यांनी प्रशासनाला दिले आहेत.