

आमठाणा : सिल्लोड तालुक्यातील खातखेडा गावाला स्मशानभूमी नसल्याने गावातील कोणाचे निधन झाले तर गावाजवळील नदी ओलांडून दुसऱ्या काठावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर येते. पावसाळ्यात तर नदीपात्रात पाणी जास्त असल्याने नागरिकांचे हाल होतात.
गावातील कचरू बंडू पहारे (९०) यांचे बुधवारी (दि.१८) निधन झाले होते. ग्रामस्थांना नदीच्या पाण्यातून वाट शोधत अंत्यविधीसाठी मृतदेह नेत दुसऱ्या काठावर अंत्यसंस्कार करावे लागले. खातखेडा या गावाची लोकसंख्या एक हजाराच्या जवळपास आहे. शासनाच्या विविध योजना गावात राबवल्या जातात. गावात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून नदी ओलांडत दुसऱ्या काठावर जावे लागते.
सध्या नदीत पाणी असल्याने अंत्यविधीचे साहित्य सांभाळत पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. शासनाने या प्रकरणाची दखल घेऊन स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
प्रस्ताव पाठवल्यावर जागा देणार
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्याशी संपर्क साधला असता गावकऱ्यांनी प्रस्ताव पाठवल्यास स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
खातखेडा गावातील ९० वर्षीय आजोबाचे निधन झाल्यानंतर ग्रामस्थांना गावशेजारील नदीच्या पाण्यातून वाट काढत दुसऱ्या काठावर अंत्यसंस्कार करावे लागले.