

Shiv Sena will conduct a panchnama of the government in Marathwada after October 5th
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्याला सतत विकासापासून दूर ठेवण्याचे काम भाजप करीत आहे. आता दुष्काळाची भीषण स्थिती असतानाही पंचनामे ऑक्टोबरमध्ये करण्याचा घाट घातला आहे. परंतु, जर ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे योग्यरीत्या पंचनामे न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून सरकारचा पंचनामा करेल, असा इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. विभागीय आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन करीत आयुक्तांना निवेदन सादर केले.
पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाड्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपाचे पिके उद्ध्वस्त झाली आहेत. बागायती क्षेत्रातील पिके थोडीफार जिवंत आहेत. मात्र, तेही आपत्कालीन लोडशेडिंग लागू केल्याने नष्ट होणार आहे. मागील वर्षी ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते, त्याची अद्याप पूर्णपणे परिपूर्ती झाली नाही. अशा परिस्थितीत राज्य शासनाने मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तत्काळ मदत देणे आवश्यक आहे, असे ठाकरे म्हणाले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सरकारविरुध्द मराठवाडा व्यापी जनआंदोलन पुकारण्यात आले आहे.
यानिमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे धरणे आंदोलन करण्यात आले. व्या आंदोलनानंतर शिवसेनेच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन दिले.
त्यानंतर आयुक्तालयासमोर सभा घेतली. व्यावेळी ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच मराठवाड्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत केलेली घोषणाही कागदावरच असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, अनिल देसाई, सुभाष पाटील, लक्ष्मण वडले, ज्योती ठाकरे, आमदार कैलास पाटील, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
जाती-पातीच्या भिंती पाडा
महाराष्ट्रात जाती-पातीच्या भिंती उभ्या करण्याऐवजी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. झेन-जीने ज्या पद्धतीने आपली ताकद दाखवली, त्याचप्रमाणे सर्व जातींच्या भिंती दूर करून महाराष्ट्राची एकजूट सरकारला दाखवून देऊ, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.