

Sand Smugglers' Activities in the Navgaon-Tuljapur Area
पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण तालुक्यातील नवगाव-तुळजापूर परिसरातील गोदावरी नदीत अवैधरीत्या वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्यावेळी वाळू वाहतुकीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
तालुक्यातील नवगाव तुळजापूर गोदावरी नदीच्या परिसरामधून गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरीत्या वाळू उपसा होत आहे. वाळू वाहतूक वाहनांमुळे शेतातील पाईपलाईनसह पिकांचे नुकसान नित्याचे झाले आहे. त्रस्त झालेल्या नागरिक व शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे.
या वाळू तस्करीला संबंधित आर्थिक संबंधातून पाठबळ देत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. नवगाव परिसरातील कब्रस्तान समोरील गोदावरी नदीतून अवैधरित्या दररोज लाखो रुपयांची वाळू उत्खनन करून वाहतूक करण्यात येतअसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तुळजापूर येथून जवळपास सात ते आठ ट्रॅक्टर वरील लोखंडी यारी मशीनद्वारे वाळूचा उत्खनन करून तस्करी करण्यात येत आहे. तहसील प्रशासनाने डोळेझाक केल्याने वाळूमाफियांची हिंमत वाढली आहे.