

Unseasonal Rain Vaijapur Taluka
वैजापूर : तालुक्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. बुधवारी रात्रीपासून तालुक्यातील बहुतांश भागात पुन्हा विजेच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत सलग दुसऱ्या दिवशीही (गुरुवारी) सगळीकडे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
या पावसामुळे वातावरणातील उष्मा कमी होऊन नागरिकांना उकड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी शेतातील काढणीला आलेल्या कांदा, गहू, बाजरी, मका, हरबरा या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होत असून याबाबत शासनाने गांभीर्याने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
बुधवारी झालेल्या पावसाने तालुक्यातील बोरसर शिवारातील शेत गट क्रमांक १५२ मधील नाना भागीनाथ शेवाळे यांच्या तीन एकर क्षेत्रातील मका पीकाला अवकाळीचा फटका बसल्याने नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तसेच याच शिवारातील गट क्रमांक ३७ मधील यांच्या एक एकर क्षेत्रातील बाजरीचे पीक वादळी पावसाने आडवे झाले. गट क्रमांक ३४ मधील दत्तात्रय आनंदा गोरे यांच्या एक एकर क्षेत्रातील बाजरीसह तालुक्यातील शेतकऱ्यांचे उन्हाळी कांदा, मका आदी पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.