

sambhajinagar The plot grabbing has been exposed
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सरकारी दस्त नोंदणीच्या आय-सरिता या अत्याधुनिक आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या प्रणालीला सुरुंग लावत भूमाफियांनी जळगावच्या एका महिलेचा सिल्लोड येथील प्लॉट हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मूळ मालकीण जळगावला असताना त्यांच्या नावे तोतया महिला उभी करून बनावट कुलमुखत्यारपत्र (जीपीए) मिळवण्यात आले. याप्रकरणी प्रभारी सह दुय्यम निबंधकांनी स्वतः फिर्यादी होऊन सिटी चौक पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.३०) गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार २६ डिसेंबर २०२५ ते ३० मार्चदरम्यान सह दुय्यम निबंधक, छत्रपती संभाजीनगर क्र. १ येथे घडली. पठाण वसिमखान युसूफ खान, शाकीरखान जुम्मा खान पठाण, शेख गुफरान शेख युसूफ (तिघे रा. सिल्लोड) आणि एका अज्ञात महिलेचा आरोपीमध्ये समावेश आहे. फिर्यादी प्रभारी सह दुय्यम निबंधक (क्र. १) रवींद्र युवराज तोंडे यांच्या तक्रारीनुसार, सिल्लोड येथील गट क्रमांक ९४/१ मधील प्लॉट नं. १०८ च्या मूळ मालकीण सुरेखा विलास चौधरी (रा. जळगाव) यांनी निबंधक कार्यालयाकडे तक्रार अर्ज दिला होता.
या अर्जाची तांत्रिक पडताळणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. २६ डिसेंबर २०२५ रोजी आरोपींनी सुरेखा चौधरी यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड आणि फोटो वापरून कुलमुखत्यारपत्र नोंदवून घेतले होते. विशेष म्हणजे, मूळ मालकिणीचे वय ६३ वर्षे असताना, बनावट महिलेने स्वतःचे वय ४५ वर्षे भासवले होते. आधार क्रमांकही चुकीचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
प्रणालीतील त्रुटी की अर्थपूर्ण डोळेझाक ?
नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या आय-सरिता प्रणालीत आर- ोपींनी तांत्रिक फेरफार करून बनावट माहिती अपलोड केली. खऱ्या मालकिणीची ओळख पटल्याचे सांगत दोन साक्षीदारांनी संगनमताने सह्या केल्या. शासकीय यंत्रणेची आणि नियमांची उघड दिशाभूल झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शासकीय पोर्टलवर बनावट आधारकार्ड स्वीकारले कसे गेले? नोंदणीवेळी फोटोतील तफावत अधिकाऱ्यांच्या लक्षात का आली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जमीन हडपणाऱ्या टोळ्यांना कोणाचा वरदहस्त ?
बनावट कुलमुखत्यारपत्र नोंदणीचे अनेक प्रकार वारंवार समोर येत आहेत. त्यावरून जमिनी हडप करणारी एक मोठी टोळी सक्रिय असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. महसूल विभागातील काही खबऱ्यांमार्फत वृद्ध मालक तसेच प्रलंबित मालमत्तांची माहिती अशा टोळ्यांना पुरविली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या टोळ्या बनावट कागदपत्रे तयार करून तोतया मालक उभे करतात. एकदा जीपीए हाती लागला की, भूमाफिया तातडीने ती मालमत्ता तिसऱ्या व्यक्तीला विकून मोकळे होतात.