

छत्रपती संभाजीनगर : महावीर चौकात तीन वाहतूक पोलिसांना वाहनचालक बाप-लेकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, सोमवारी (दि. २०) रात्री ८ वाजेच्या सुमारास मोंढा नाका पुलाखाली आणखी दोन पोलिसांना शिवीगाळ करत एका गावगुंडाने मारहाण केली. तू मेरेको जानता नहीं, मैं कौन हु, मैं तेरे को देख लुंगा, अशी धमकी देत आरोपीने पोलिसाची कॉलर पकडून भरचौकात राडा केला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज ऊर्फ माया (रा. संजयनगर, बायजीपुरा) असे या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी शहर वाहतूक शाखा-१ चे अंमलदार चेतन गारदे हे अमरप्रीत सिग्नल येथे ड्यूटीवर असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना मोंढा नाका येथे ट्रॅफिक जाम झाल्याची माहिती दिली. तसेच कोणीतरी तुमच्या वाहतूक शाखेच्या अंमलदारासोबत वाद घालत आहे,असेही सांगितले. तेव्हा गारदे यांनी हवालदार शिंदे यांना फोन केला असता त्यांनी मदतीसाठी बोलावले. गारदे यांनी तात्काळ मोंढा नाका सिग्नलकडे धाव घेतली.
तिथे शिंदे आणि गिरी हे गाडी लावण्याच्या कारणावरून दोन अन-ोळखी इसमांचा वाद सोडवण्याचा व त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. परिस्थिती पाहून गिरी यांनी कंट्रोलला कॉल करून मदत मागितली. त्यानंतर जिन्सी डायल ११२ चे सहाय्यक फौजदार मुनीर आणि सुक्रे हेही घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी अरबाज याने शिवीगाळ करत अंमलदार चेतन गारदे यांची कॉलर पकडली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही मारहाण केली. त्यानंतर तू मेरेको जानता नही मैं कौन हु, मैं तेरे को देख लुंगा, अशी धमकी देत तो तेथून साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार उपेंद्र कुतूर करत आहेत.
खाकीचा धाक उरला नाही का?
शहरात भररस्त्यात थेट पोलिसांवर हात उचलण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. गेल्या चार महिन्यांत सात घटना घडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील, याची प्रचितीच या घटनांवरून येत आहे.