

Sambhajinagar Municipal Corporation election campaign
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीच्या प्रचारात प्रमुख राजकीय पक्षांची मोठी गोची झाली आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगरात सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. यातील कोणी कालपर्यंत महापालिकेत सत्तेत एकत्र होते. तर कोणी सध्या राज्याच्या सत्तेत सोबत आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी पक्षावर आरोप करायचे तरी कसे ? असा प्रश्न पदाधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या २९ प्रभागांतून एकूण ११५ नगरसेवक निवडण्यासाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. महायुती तसेच महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत एकमत न झाल्याने दोन्ही आघाड्यांमधील सर्वच घटक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे राज्यातील सत्तेत एकत्र असलेले भाजप, शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हे तिघेही इथे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
त्यासोबतच काँग्रेस, ठाकरेंची शिव सेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी तसेच एमआयएम पक्षानेही आपापले उमेदवार स्वतंत्रपणे उतरविले आहेत. दोन दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, आता एकमेकांवर आरोप करताना प्रमुख पक्षांची गोची झाली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन पक्ष राज्यात सत्तेत एकत्र आहेत. त्यामुळे त्यांना विकासाच्या मुद्द्द्यावरून एकमेकांना दोष देणे कठीण झाले आहे.
तशीच काहीशी अवस्था शिव-सेना उबाठा पक्षाचीही आहे. शिवसेना उबाठा पक्षही महापालिकेत गेली तीस वर्षे भाजपसोबत सत्तेत राहिलेला आहे. शिवसेना अखंड असताना जे पदाधिकारी शिवसेनेत होते, तेच आता दोन्ही शिवसेनेमध्ये विखुरलेले आहेत. त्यामुळे शहराच्या विकासावरून दुसऱ्यावर बोट दाखवायचे ठरल्यास ते आपल्याकडेही येईल, अशी भीती या सर्वांनाच सतावते आहे.