

Internal dispute between E-bus drivers and officers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ई-बसचे चालक आणि सुपरवायजरमध्ये अंतर्गत वाद झाल्याने रविवारी (दि.४) सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत म्हणजे तब्बल चार तास विविध मार्गांवर धावणाऱ्या ७० बस जागेवरच उभ्या होत्या. वेळेनुसार ई-बस उपलब्ध नसल्याने विविध मार्गावरील प्रवाशांना बराच वेळ ताटकळावे लागले. ऐनवेळी विविध मार्गांवर बस उपलब्ध करून देताना एसटीच्या अधिकाऱ्यांची बरीच धावपळ उडाली.
यामुळे ७० बस जागेवरच थांबलेले चार तासात जवळपास ८ हजार कि.मी.च्या फेऱ्या रद्द झाल्या. एसटीच्या दिमतीला ई-बस प्रवासी सेवा देत आहेत. या बसला एसटीच्या वतीने ठरवलेल्या करारानुसार भाडे देण्यात येते. रविवारी सकाळी अचानक ६ ते सकाळी १० वाजेपर्यंत चालकांनी चाार्जिंग सेंटरवरून बस काढण्यास नकार दिला.
चालकांनी सुपरवायजरच्या मनमानी कारभारांविरुद्ध हा पवित्र घेतल्याची माहिती मिळताच एसटीच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत मध्यस्थी करत हा प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नाला तब्बल चार तासांनंतर यश मिळाले. त्यानंतर मात्र विविध मार्गांवर ई-बस धावण्यास सुरुवात झाली.
प्रवासी ताटकळले
दरम्यान सकाळी ६ वाजेपासून ई-बस विविध मार्गावर प्रवासी सेवा देतात. रविवारी बस आल्या नसल्याने विविध मार्गावरील प्रवासी बराच वेळ ताटकळले. ही घटना समजताच एसटीच्या अधिकाऱ्यांनी ऐनवेळी शिवशाहीसह लालपरी प्रवाशांना उपलब्ध करून दिली. ऐनवेळी बस उपलब्ध करताना अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
तासाला एक हजार रुपये दंड
electr ई-बस वेळेवर उपलब्ध करून देणे संबंधित कंपनीचे काम आहे. वस उपलब्ध नसल्यास एका तासाला एसटीच्या वतीने एक हजार रुपये दंड वसूल केला जातो. या नियमांनुसार चार तासांचे ७० बसकडून सुमारे २ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली.