

Short circuit farm fire
सुलतानपूर : खुलताबाद तालुक्यातील कानडगाव येथे विद्युत तारेच्या स्पार्किंगमुळे उसाच्या शेताला भीषण आग लागून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याची घटना घडली. गट क्रमांक ९६ मधील शेतकरी दिनेश अंबादास जाधव यांच्या शेतातील विहिरीजवळ असलेल्या विद्युत पोलच्या तारेतून अचानक स्पार्किंग झाल्याने उसाच्या पिकाने पेट घेतला. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने मोठ्या प्रमाणात ऊस पीक जळून खाक झाले.
या आगीत गट क्रमांक ९६ मधील एकूण ०.७९ आर क्षेत्रावरील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये दिनेश अंबादास जाधव यांच्या सुमारे ०.३९ आर क्षेत्रातील तर संभाजी पांडुरंग जाधव यांच्या ०.४० आर क्षेत्रातील ऊस पूर्णपणे जळून गेला. या घटनेत अंदाजे ३ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आग लागल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, आग वेगाने पसरल्याने संपूर्ण पीक आगीत भस्मसात झाले. घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी नारायण पठ्ठे यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीचा पंचनामा केला.
यावेळी त्रिंबक जाधव, हरीकिसन जाधव, राजू जाधव, रविदास चव्हाण, दीपक जाधव यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.