

Kannad Nachanwel School Lock Opened
पिशोर : कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी शाळेला ठोकलेले कुलूप अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आणि चार शिक्षकांच्या तात्काळ नियुक्तीनंतर उघडण्यात आले. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली होती. अखेर प्रशासनाने तातडीने निर्णय घेत शाळेचे कामकाज पूर्ववत केले.
नाचनवेल जिल्हा परिषद प्रशालेत गेल्या अनेक महिन्यांपासून इंग्रजी, गणित, विज्ञान यांसह चार शिक्षकांची महत्त्वाची पदे रिक्त होती. शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत होता. याबाबत ग्रामस्थ तसेच शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाकडे अनेक वेळा लेखी निवेदने देऊन रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती. मात्र, वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी अखेर एकत्र येत शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला.
“आमच्या मुलांच्या भविष्याशी खेळू देणार नाही. जोपर्यंत शाळेत शिक्षक रुजू होत नाहीत, तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही,” असा निर्धार पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला होता. आंदोलनात तरुणांसह ज्येष्ठ नागरिक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संपूर्ण गाव एकवटल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
शाळेला कुलूप ठोकल्याची माहिती मिळताच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी दिवेकर आणि केंद्रप्रमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ग्रामस्थ लेखी आदेशावर ठाम राहिले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवर तातडीने हालचाली करण्यात आल्या. प्रशासनाने रिक्त पदांवर चार शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करण्याचे आदेश काढले.
नवनियुक्त शिक्षक शाळेत रुजू झाल्यानंतर तसेच उर्वरित मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे शिक्षण विभागाने लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांचे समाधान झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी शाळेचे कुलूप स्वतः काढून नवनियुक्त शिक्षकांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले.
काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळेचा घंटानाद पुन्हा घुमल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी ग्रामस्थांनी दाखविलेली एकजूट आणि जागरूकता कौतुकाचा विषय ठरली आहे.