

Sambhajinagar Heavy Rain water enter in 50 house
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शनिवारी (दि. २७) रात्री कहर केला. रात्रीभर थांबून थांबून मुसळधार पाऊस बरसल्याने शहराच्या विविध वसाहतींमधील सुमारे ५० हून अधिक घरांत पाणी शिरले. तसेच राहुलनगर, सादातनगर, सातारा, देवळाई परिसरातील नाल्यांना पूर आल्याने पाणी रस्त्यावर साचले होते. तर सातार्यातील लक्ष्मी कॉलनीचा पूल वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच महापालिकेची यंत्रणा सकाळपासून बचाव कार्यात जुंपली होती. तर आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनीही विविध वसाहतींमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना केली.
शहरात यंदा जून ते ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कमी राहिला. परंतु, सप्टेंबरमध्ये पावसाने तिन्ही महिन्याची कसर काढली आहे. मागील आठ दिवसांपासून पावसाची अधूनमधून हजेरी सुरूच आहे. परंतु, सलग तीन दिवसांपासून मुसळाधार आणि संततधार हजेरी सुरू असतांनाच शनिवारी सायंकाळपासून शहरात धोधो बरसण्यास सुरुवात झाली. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे शहराच्या सखल भागातील रस्ते आणि नाल्यांना पूर आला असून हे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने अनेकांना नुकसानीचा सामना करावा लागला आहे. सातारा-देवळाईतील अनेक नाले नागरिकांनी व बांधकाम व्यवसायीकांनी भर टाकून बुजविले आहेत. तर काही ठिकाणी नाल्याचा प्रवाह वळविण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचा कहर सर्वाधिकप्रमाणात याच भागात दिसून आला. तर रेल्वेस्टेशनच्या सादातनगर आणि राहूलनगर भागात थेट नागरिकांच्या घरामध्ये शिरले होते. घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर पहाटेपासूनच पथक घटनास्थळी धाव घेत घरांसह अंडरग्राऊनमध्ये असलेल्या दुकानांतील पाणी काढण्यात आहेत.
रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख स्वप्निल सरदार व अग्निशमन विभागाने रात्र जागून काढली. मात्र पहाटेपासूनच पंपिंग आणि इतर कॉल येणे सुरू झाले. यात जालान नगर 1 येथील येथील गौरव रेसिडेन्सी, बीड बायपास येथील घुगे पेट्रोल पंप, महापालिका आणि पोद्दार शाळेसमोर, रेल्वे स्टेशन राहुल नगर येथील गल्ली नंबर १ आणि रेवती सोसायटी, बीड बायपास येथील हॉटेल निशांत पार्क मागे व्हीनस हाऊसिंग सोसायटी, कांचनवाडीतील अग्रसेन भवन विद्यामंदिरच्या बाजूला अंडरग्राउंड दुकानात, टीव्ही सेंटर येथे हिंदुस्थान मेडिकलच्या बाजूला, भगीरथ नगरमधील देवगिरी स्कूल समोर अपार्टमेंट, पिसादेवी रोड, बंबाटनगर, मल्हार चौक अशा विविध ठिकाणी रस्त्यावर पाणी साचणे आणि ५० हून अधिक घरांमध्ये पाणी शिरण्याची घटना घडली.
सातारा येथून धुळे-सोलापूर महामार्गकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील पूल 2 असून रविवारी पहाटे मुसळधार पावसामुळे येथील नाल्याला आलेल्या पूरामुळे हा पूल खचला आहे.
सातारा परिसरातील लक्ष्मीकॉलनी परिसरात मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला. पाण्याच्या प्रवाहामुळे या नाल्यावरील पूल वाहून गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या भागाला भेट देत पर्यायी मार्ग सुरू करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या.
बीड बायपास रस्त्यावर असलेल्या मधुबन हॉटेलसमोरी परिसरात तब्बल 4. पाच फुटापर्यंत पाणी साचले होते. याबाबत नागरिकांनी महापालिका प्रशासनाला माहिती दिली. मात्र, कोणीही घटनास्थळी न आल्याने अखेर परिसरातील नागरिकांनी जेसीबीद्वारे स्वतःच पाणी वाहून जाण्यासाठी खोद काम केले.
शहरात रात्रभर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात पाणी साचल्याचे कॉल अग्निशमन विभागाल प्राप्त झाले. पथकासोबतच प्रशासक जी. श्रीकांत यांनी देखील पहाटेपासून विविध भागांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधत सतर्कतेचा इशारा दिला.