

Sambhajinagar Encroachment Campaign Strong opposition to widening of Champa Chowk to Jalna Road
छत्रपती संभाजीनगर: आधी घर द्या मगच पाडापाडी करा, अशी मागणी बायजीपुरा, रेंगटीपुरा, मोंढा, दादा कॉलनी, भवानीनगरातील नागरिकांनी रविवारी (दि.२७) एका बैठकीत केली. चंपा चौक ते जालना रोडच्या रस्ता रुंदीकरणात या भागातील ९०० मालमत्ता बाधित होत असल्याने हवालदिल झालेल्या नागरिकांनी संताप व्यक्त करत मनपा प्रशासन आणि प्रशासक जी. श्रीकांत यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
शहरातील रस्ते रुंदीकरणासाठी महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत आत्तापर्यंत मुकुंदवाडी, संजयनगर, चिकलठाणा, बीड बायपास, काचंनवाडी, नक्षत्रवाडी, पडेगाव येथील मालमत्तां मनपाने पाडल्या. दरम्यान चंपा चौक ते जालना रोडच्या रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
हा रस्ता ३० मीटरचा असून, विद्यमान विकास आराखड्यात १८ मीटरचा दाखविण्यात आला आहे. मनपाकडून यापूर्वीच चंपा चौक ते जालना रोड हा शंभर फूट करण्यासाठी अनेक मालमत्ताधारकांना टीडीआर देण्यात आलेला आहे. या रस्त्यामध्ये संजयनगर, रेंगटीपुरा, जुनामोंढा, दादा कॉलनी, भवानीनगर या भागातील सुमारे ९०० पेक्षा अधिक मालमत्ता बाधित होत आहेत. रस्त्यामध्ये घरे जाणार असल्यामुळे या भागातील नागरिक हवालदिल झाले आहेत.
त्यामुळे या भागातील नागरिकांनी एकत्र येत बाथ्रीतेली मंगल कार्यालयात बैठक घेतली. आम्ही ६० ते ७० वर्षांपासून या भागातील रहिवासी आहोत. आम्ही घाम गाळून मोठ्या कष्टाने घरे बांधली आहेत. अनेकांनी आपल्या आयुष्याची कमाई गुंतवून या घरांचा पाया रचला आहे. मात्र, आता कोणतीही पुनर्वसनाची तरतूद न करता अचानक आमच्या घरांवर बुलडोझर चालवले जाणार आहे. यामुळे सामान्य, गरीब, कष्टकरी वर्गाच्या घरांवर अन्याय होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. तसेच पर्यायी मार्ग म्हणून हॉटेल अजमेरी कडूनही हा रस्ता केला जाऊ शकतो. मात्र मनपा तसे न करता आमची घरे पाडत आहे, असा आरोपही नागरिकांनी केला. यावेळी नागरिकांनी राजकीय नेत्यांचाही निषेध केला. निवडणुकीच्या वेळी उंबरे झिजवणारे, आता गायब झाले आहेत. आम्ही संकटात असताना कोणीही आमच्या पाठीशी उभे नाही, अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाचाही काही भाग रस्ता रुंदीकरणात बाधित ठरत आहे. त्यामुळे आधी ते पाडा, नसता आम्ही त्यांच्या दारात जाऊन बसतो, अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली.
रस्त्याच्या कडेला उभ्या मोकळी करून देत सांगितले की, आम्ही आयुष्यभर रावलो, एकेक वीट जमवून घर बांधल. आमचे सरकारला सांगणे आहे की, आधी पर्यायी जागा द्या, नंतर आमची घरे पाडा. आम्ही भीक मागून हे घर उभारलेल नाही. आमचेही इथे हक्काचे अस्तित्व आहे.
2 श्रीकांत यांच्या नेतृत्व-खाली चालू असलेल्या या कारवाईवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रस्ते रुंदीकरण गरजेचे असले, तरी माणसांची घरे उद्धवस्त करून विकासाचा डांगोरा पिटणे योग्य नाही, असे म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला.
3 गरिबांवर अन्याय करणारी ही बुलडोझर संस्कृती थांबवावी, अशी एकमुखी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे. पुनर्वसनाशिवाय कोणाचेही घर पाडू नये अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला आहे.