

CCI cotton procurement issurs
सिल्लोड : शासकीय सीसीआय खरेदी केंद्र शेतकरी सहकारी जिनिंगसह इतर जिनिंगमध्ये तातडीने सुरू करावे, शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी करून त्यांना आर्थिक समृद्धीकडे नेण्याचा ठोस प्रयत्न करावा, तसेच शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या ग्रेडर व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या रास्त व हक्काच्या मागण्यांसाठी राज्याचे माजी मंत्री तथा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने सिल्लोड शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सोमवारी (दि.२२) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात “शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी झालाच पाहिजे”, “शासकीय खरेदी केंद्र सहकारी जिनिंगमध्ये चाचणी सुरू केलीच पाहिजे”, “शेतकऱ्यांना अडवणाऱ्या ग्रेडरवर कारवाई झालीच पाहिजे”, “सीसीआय केंद्रातील दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा करा” अशा ठणकावून सांगणाऱ्या मागण्या करण्यात आल्या.
“किसान शेतकरी के सन्मान में शिवसेना मैदान में”, “शिवसेनेचा विजय असो”, “आमदार अब्दुल सत्तार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “कुणी कितीही मारा बाता, शेतकऱ्यांचा आमदार अब्दुल सत्तारच नेता” अशा आक्रमक घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
रास्ता रोको आंदोलनामुळे जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या दोन्ही बाजूंना काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, एकाही वाहनचालकाला किंवा नागरिकांना त्रास होऊ न देता शिस्तबद्ध आंदोलन करणे, हे या आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले.
रुग्णवाहिकेला तत्काळ मार्ग – सामाजिक भान जपले
आंदोलन सुरू असतानाच रुग्णाला घेऊन येणारी रुग्णवाहिका दिसताच आमदार अब्दुल सत्तार यांनी आंदोलकांना तात्काळ रस्ता मोकळा करून देण्याचे आदेश दिले. कोणताही अडथळा न आणता रुग्णवाहिकेला मार्ग देण्यात आला आणि रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
चोख पोलीस बंदोबस्त
रास्ता रोको आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
आमदार अब्दुल सत्तारांची सडेतोड भूमिका
यावेळी आंदोलनस्थळी बोलताना माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, लोकशाहीत आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे; मात्र जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणे हे मोठे पाप आहे. शेतकऱ्यांना कचाट्यात पकडून वेठीस धरण्याचे राजकारण म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीवर अन्याय असून त्यांना संकटात लोटण्याचे पाप आहे.
हा रास्ता रोको कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून केवळ शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. तातडीने सीसीआय खरेदी केंद्र सहकारी जिनिंग प्रेसमध्ये सुरू करण्यात यावे, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील, असा कडक इशारा त्यांनी दिला.
विधानसभेत शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्यांक, महिला व युवकांच्या हितासाठी आवाज उठवूनही अंमलबजावणी न झाल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
आंदोलनातील प्रमुख उपस्थिती
या रास्ता रोको आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, शहरप्रमुख मनोज झवर, नॅशनल सूतगिरणीचे चेअरमन व नूतन नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अर्जुन पा. गाढे, बाजार समितीचे सभापती विश्वासराव दाभाडे, उपसभापती संदीप पा. राऊत, दुर्गाताई पवार, जीपचे माजी अध्यक्ष श्रीराम पा. महाजन, नगरसेवक डॉ. फिरोज खान, किशोर अग्रवाल, आसिफ बागवान, सुधाकर पाटील, राऊत बागवान, नरेंद्र बापू पाटील, जुम्माखा पठाण, शेख इमरान गुड्डू यांच्यासह हजारो शेतकरी आपल्या रास्त मागण्यांसाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.