

RTO takes action against unauthorized tanker in sambhajinagar city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील अनधिकृत टँकरांवर आरटीओने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर निर्माण झालेला पाणीपुरवठ्याचा पेच अखेर सुटला असला, तरी नो नेटवर्क भागातील नागरिकांना अद्यापही पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. गेल्या पाच दिवसांपासून टँकरपुरवठा ठप्प झाल्याने या भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर नागरिकांचे हाल होत आहेत.
आरटीओ आणि टँकरचालक यांच्यातील वादामुळे शहरातील टँकरसेवा पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे पाईपलाईन नसलेल्या वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा खंडित झाला. परिस्थिती गंभीर होताच महापालिकेने पुढाकार घेत दोघांमध्ये मध्यस्थी केली. चर्चेनंतर तोडगा निघाल्याने टैंकर पुन्हा रस्त्यावर उतरले.
मात्र पाच दिवसांचा साचलेला बॅकलॉग भरून काढणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे. मनपा प्रशासनाच्या माहितीनुसार, शहरातील सर्व भागांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा पोहोचण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, पाणी न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, उन्हाळा तीव्र होण्यापूवी मनपाने ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
टँकरचालकांची मनमानी...
सरकारी टँकरसेवा बंद असल्याने खासगी टँकरचालकांची मक्तेदारी वाढल्याचे चित्र आहे. अनेक भागांत खासगी टैंकर सहज उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना जादा दर मोजावे लागले. काही ठिकाणी अतिरिक्त दर आकारण्यात आल्याचे बोलले जात आहे. नियोजनाअभावी सर्वसामान्यांना पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागल्याने मनपा प्रशासनावर टीका होत आहे.