

Remove signboards on trees and encroachments along the riverbank within seven days!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पर्यावरण संवर्धन, वाहतुकीची सुरक्षितता आणि पावसाळ्यात पाणीवाहिनी सुरळीत राहावी, यासाठी महापालिकेने झाडांवरील जाहिरात फलक, बोर्ड, खिळे, तारेचे कुंपण, नदी-नाल्यांच्या काठावरील अतिक्रमणे यासह रस्त्यांवरील अनधिकृत शेड आणि बांधकामे सात दिवसांच्या आत स्वखर्चाने हटविण्याचे आवाहन केले आहे.
या मुदतीनंतर कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याचा इशारा मनपाच्या उद्यान विभागाकडून देण्यात आला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने खिळेमुक्त झाड, वेदनामुक्त निसर्ग या अभियानांतर्गत शहरातील झाडांवर लावण्यात आलेले जाहिरात फलक, विविध प्रकारचे बोर्ड, खिळे, तारेचे कुंपण तसेच विद्युत रोषणाईची जोडणी काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे झाडांच्या नैसर्गिक वाढीस अडथळा निर्माण होऊन त्यांचे आयुष्यमान कमी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे ते सात दिवसांत काढून घ्यावे, अन्यथा संबंधितांवर वन संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा उद्यान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच झाडांवर खिळे ठोकणे अथवा जाहिरातींचे फलक लावल्याचे आढळल्यास प्रथम वेळी पाच हजार रुपये, दुसऱ्या वेळी दहा हजार रुपये आणि तिसऱ्या वेळी २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.
तर गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये संबंधितांविरुद्ध गुन्हाही दाखल केला जाऊ शकतो, असा इशाराही मनपाने दिला आहे. दरम्यान, खाम आणि सुखना नदीसह शहरातील विविध नदी-नाल्यांच्य काठावरील अतिक्रमणांमुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाहाला अडथळा होत असून पूरस्थितीचा धोका वाढत आहे सव तातडीने त्यामुळे अशा अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे हटवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासह मुख्य रस्ते, अंतर्गत माग् आणि गल्लीबोळांमध्ये उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड, अनधिकृत बांधकामे तसेच व्यवसायासाठ केलेले अतिक्रमण यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणान आहे. सात दिवसांची मुदत संपल्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता धडक कारवाई केली जाईल अशी माहिती उद्यान अधीक्षकांनी दिली.
सात दिवसांनंतर थेट कारवाई
महापालिकेने अतिक्रमणधारकांना स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे हटविण्याची अंतिम संधी दिली आहे. झाडांवरील फलक, खिळे, तारेचे कुंपण, नदी-नाल्यांलगतची अतिक्रमणे तसेच रस्त्यांवरील अनधिकृत शेड आणि बांधकामे सात दिवसांत न हटविल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केली जाणार आहे. पर्यावरण संरक्षणासह पावसाळ्यात नाल्यांचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले